Manoj Jarange patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange: भुजबळांच्या बालेकिल्ल्यात 15 जागांसाठी 150 मराठा उमेदवार इच्छुक; 29 तारखेला जरांगे घेणार निर्णय

Mangesh Mahale

Maharashtra Political News : सरकारने सगेसोयरे अधिसूचना जारी करून ओबीसीमधून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जरांगेंचा लढा सुरु आहे, आरक्षण मिळाले नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर मराठा उमेदवार, निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे त्यांच्याकडे राज्यभरातून अहवाल पाठवण्यात येत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे की नाही, याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे हे 29 ऑगस्ट रोजी घेणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभेच्या जागांसाठी १५० मराठा उमेदवार इच्छूक आहेत. याबाबतचा अहवाल जरांगेकडे देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्वच १५ जागा लढविण्यास मराठा व आरक्षणाला पाठिंबा देणारे उत्सुक असून, या पंधराही जागांसाठी आतापर्यंत दीडशेपेक्षा अधिक इच्छुकांनी आपले अहवाल जरांगे-पाटील यांच्याकडे सादर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात 'जरांगे फॅक्टर'मुळे अनेक बड्या नेत्यांचा पराभव झाला. त्याचा धसका महायुती आणि आणि आघाडीतील विधानसभा इच्छुकांनी घेतला आहे.

मराठवाड्यानंतर उत्तर महाराष्ट्रात (नाशिक) 'जरांगे फॅक्टर'अनेकांची झोप उडवणार असल्याचे या अहवालावरुन दिसते. नाशिक हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे जरांगे पाटलांचे भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष आहे.

आरक्षणावरुन जरांगे आणि भुजबळ यांच्यातील आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मराठा समाजाने भुजबळांच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतली. आगामी विधानसभा निवडणूक आरक्षणाला विरोध करणाऱ्या विद्यमान मराठा आमदारांना धडा शिकवण्याची रणनीती जरांगे पाटलांनी आखली आहे.

विधानसभेसाठी जरांगेंचे उमेदवार रिंगणात उतरले तर यानिमित्ताने पुन्हा एकदा भुजबळ-जरांगे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. येवला मतदारसंघात भुजबळांच्या विरोधात जरांगेंचा (Manoj Jarange) उमेदवार असेल का? अशी चर्चा रंगली आहे.

दोन दिवसापूर्वीच छगन भुजबळ यांनी जरांगे यांना टोला लगावला होता. "त्यांना मी सांगितले आहे, आगामी विधानसभा मतदारसंघात 288 मतदारसंघात उमेदवार द्या, त्यांच्यासाठी तयारी करा, मला शिव्या देऊन काय फायदा आहे.

तुमचे उमेदवार निवडून येण्यासाठी वेळ द्या. तुमचे उमेदवार निवडणूक येणार, कदाचित तुम्ही मुख्यमंत्रीही होणार, त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर शिव्याशाप देऊन चालत नाही, त्यामुळे आतापासूनच आपलं वागणं सुधारले पाहिजे, असा टोला भुजबळांनी जरांगेंना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT