North Maharashtra Farmers : महायुती सरकारकडून बुधवारी राज्यातील कर्जमाफ करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. परंतु उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या पहिल्याच यादीत मोठा झटका बसला. कारण, उत्तर महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याचा या यादीत समावेश नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांतील ५५३ शेतकऱ्यांची यादी जाहीर केली. परंतु या पहिल्याच यादीत उत्तर महाराष्ट्राला पूर्णपणे डावलण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
पहिल्या यादीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याचे कर्जमाफ झालेले नाही. पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने हजारो पात्र शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, सरकारच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पहिल्या यादीत केवळ ५३३ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची आधारभूत माहिती वेळेत न मिळाल्यामुळे या यादीला विलंब लागला आहे. या प्राथमिक लाभार्थ्यांच्या खात्यावर एकूण दोन कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपये वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकरी पात्र ठरणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आला असून, यासाठी ४० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय पहिली यादी
जिल्हा शेतकरी
अमरावतीः ५८
लातूर : १३३
नागपूर : १६
पुणे : ८५
सातारा : ३८
सोलापूर : २१
ठाणे : १८२
वरील यादीत उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्हे आणि अहिल्यानगरला पूर्णपणे वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून संतापाची भावना व्यक्त होत आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या २३ हजार ७९८ कर्जदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनीही त्यांच्या कर्जदारांची माहिती शासनाला सादर केली आहे. जिल्ह्यातील सुमारे २५ हजार शेतकरी पात्र असतानाही पहिल्या यादीत एकाही शेतकऱ्याचा समावेश न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आता शासनाकडून जाहीर होणाऱ्या दुसऱ्या लाभार्थी यादीकडे उत्तर महाराष्ट्रातील हजारो पात्र शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. पहिल्या यादीत नाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण असून, पुढील टप्प्यात तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे दुसऱ्या यादीकडे लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.