

Mumbai News : राज्य सरकारने बुधवारी राज्यातील कर्जमाफ करण्यात आलेल्या शेतकऱ्याची पहिली यादी जाहीर केली आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांपैकी प्रातिनिधिक पद्धतीने कर्जमाफीतील पात्र असलेल्या 553 शेतकऱ्यांच्या नावांची यादी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जाहीर केली आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करत आहोत, असेही यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी 36,585 कोटींची भरीव तरतूद केली आहे. यामाध्यमातून 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.
ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करुन त्यांना नव्या जोमाने शेती करण्यासाठी राज्य सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यापूर्वी कर्जमाफी झाल्यास त्याला कर्ज मिळत नव्हते. आता कर्जमाफी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, अशी सक्ती राज्य सरकारने केली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना देखील 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येईल. 36585 कोटी आणि 12 लाख शेतकऱ्यांचा 4395 कोटी मिळून 40980 कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे. यावेळी राज्य सरकारकडून प्रातिनिधिक पद्धतीनं कर्जमाफीतील पात्र असलेल्या 553 शेतकऱ्यांच्या नावांची यादी बाबासाहेब पाटील यांनी जाहीर केली.
यादी अपलोडिंग करण्याचे काम सुरु
यादी जाहीर केलेल्या शेतकऱ्यांमध्ये लातूर जिल्हा बँक 133, ठाणे जिल्हा बँक 182,अमरावती जिल्हा बँक 58 शेतकरी, नागपूर जिल्हा बँक 16, पुणे जिल्हा बँक 85 शेतकरी, सातारा जिल्हा बँक 38 शेतकरी ,अशा एकूण 553 शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या शेतकऱ्यांचे 2 कोटी 99 लाख 37 हजार 540 रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. यादी अपलोडिंग सुरु असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली.
नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ
राज्य सरकारकडून पहिल्यांदा 5 जुलैपर्यंत यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, 2019 च्या कर्जमाफीच्या यादीतील शेतकऱ्यांची वाढ झाल्यानं वेळ लागत आहे. शेती बाह्य उत्पादनातून इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा नाही. इन्कम टॅक्सचा डेटा मिळाल्यानंतर लगेचच प्रक्रिया पूर्ण होईल, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार त्या शेतकऱ्यांची संख्या 23.63 लाख इतकी आहे. साधारणपणे 32 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.