PM Modi Gujarati letter Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

PM Modi Gujarati letter : मोदींना मराठीतून वेदना समजणार नाहीत? कांदा दरघटीवर संतप्त शेतकरी पुत्राचे गुजरातीत पत्र, राज्यभर चर्चेला उधाण

Ahilyanagar farmers send Gujarati letter to PM Narendra Modi demanding relief amid Maharashtra crashing onion prices : अहिल्यानगरातील युवा किसान सामाजिक संस्थेचा अनोखा आंदोलनाचा मार्ग; “पंतप्रधानांना मातृभाषेतूनच शेतकऱ्यांचे दु:ख कळेल” म्हणत कांद्याला हमीभावाची मागणी केली.

Pradeep Pendhare

Maharashtra Onion Crisis : महाराष्ट्रात कांद्याचे दर सातत्याने कोसळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना, अहिल्यानगरमधील एका संतप्त शेतकरी पुत्राने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य करत गुजराती भाषेत पत्र पाठवले आहे.

“पंतप्रधानांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दु:ख समजावे म्हणून, त्यांच्या मातृभाषेतून, गुजराती भाषेतून पत्र लिहिले आहे,” असा दावा युवा किसान सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राहुल बहिरट यांनी केला. या अनोख्या आंदोलनाची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात कांद्याच्या दरासाठी शेतकरी (Farmer) आक्रमक झाले असून विविध भागांत आंदोलने सुरू आहेत. अशातच अहिल्यानगरमधील युवा शेतकऱ्यांनी वेगळाच मार्ग निवडत थेट पंतप्रधानांपर्यंत आपली व्यथा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल बहिरट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजराती भाषेत पत्र पाठवत कांद्याला हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

“मराठी भाषेत लिहिलेलं पत्र कदाचित पंतप्रधानांपर्यंत (Narendra Modi) पोहोचणार नाही किंवा त्यांना त्यातील वेदना समजणार नाहीत. म्हणूनच आम्ही गुजराती भाषेची निवड केली,” असे राहुल बेरड यांनी स्पष्ट केले. आता या पत्रावर पंतप्रधान मोदी काय प्रतिक्रिया देतात, याकडे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. मात्र मागणी कमी आणि पुरवठा जास्त असल्याने बाजारभाव अक्षरशः कोसळले आहेत. आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी केवळ 1 हजार ते 1200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून कमाल दरही दीड हजारांच्या आसपास आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना प्रतिकिलो 50 पैसे ते 2 रुपये इतकाच भाव मिळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

एकीकडे बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च प्रचंड वाढला असताना दुसरीकडे शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च प्रतिकिलो 15 ते 20 रुपयांपर्यंत जात असताना बाजारात मिळणारा दर हा खर्चही भरून काढू शकत नसल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारकडून ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’मार्फत 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदी सुरू करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांच्या मते हा दिलासा अपुरा आहे. “देशाच्या ताटातील सुमारे 40 टक्के कांदा महाराष्ट्रातील शेतकरी पिकवतो, पण त्याच शेतकऱ्याला आज रडण्याची वेळ आली आहे,” अशी तीव्र भावना युवा किसान सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या गुजराती पत्रामुळे आता कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला असून, केंद्र सरकार यावर कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT