Maharashtra Zilla Parishad schools : बदली हा शिक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय! बदलीचे कार्यवाहीचा महिना आल्यावर अनेक शिक्षकांचे 'धाबे दणाणतात'. मग, बदली टाळण्यासाठी सुरू होतात, वेगवेगळे फंडे! राजकीय दबावासह वेगवेगळ्या मार्गानं ही बदली रोखण्याचा प्रयत्न होतो. हे प्रयत्न झाल्यानंतर आरोग्याची कारणे पुढं केली जातात. काहींची कारण खरं देखील असतात.
आरोग्याची कारणं सांगताना, प्रमाणपत्रांचा आधार घेतला. एवढं की काय, पुढं थेट पती-पत्नी घटस्फोट देखील दाखवला जातो. एवढं सर्व फक्त एक बदली रोखण्यासाठी, पण यातून पुढे येतो 'भ्रष्टाचार'! हा भाग वगळला, तर आज राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मनाजोगी शाळेसाठी किंवा असलेल्या शाळा कायम ठेवण्यासाठी राज्यातील 43 हजार 566 शिक्षकांनी ‘दिव्यांग’, ‘आजारी’ असल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्यातील शाळांचे 'आरोग्य' चर्चेत आलं आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या (Teachers) बदल्यांची लांबलेली प्रक्रिया आता वेग घेताना दिसत आहे. ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरकार निर्णयानुसार, ही प्रक्रिया 31 मे रोजीच पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र यंदा ही प्रक्रिया लांबली.
राज्यातील (Maharashtra) शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थांचा शाळेत जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. लांबलेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत मनाजोगी शाळा मिळावी किंवा असलेली जागा कायम राहावी, यासाठी शिक्षकांनी 'फिल्डिंग' लावण्यास सुरवात केली आहे.
मनाजोगी शाळा मिळविण्यासाठी किंवा असलेली शाळा कायम ठेवण्यासाठी राज्यातील 43 हजार 566 शिक्षकांनी ‘दिव्यांग’, ‘आजारी’ असल्याचा दावा केला आहे. यात विदर्भातील 11 हजार 315 शिक्षकांचा समावेश आहे. यामुळे बदली पोर्टलवरील या आकडेवारीमुळे राज्यातील शाळांचे ‘आरोग्य’ चर्चेत आले आहे.
गेल्या महिन्यात राज्यातील 1 लाख 83 हजार 996 जिल्हा परिषद शिक्षकांनी बदली पोर्टलवर आपले ‘प्रोफाईल’ अद्ययावत केले आहेत. आता त्यातील संवर्ग एक आणि संवर्ग दोनमधील शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. त्यानुसार, संवर्ग एकमधून बदली मिळविण्यासाठी किंवा बदलीतून सूट मिळविण्यासाठी 43 हजारांवर शिक्षकांनी अर्ज भरल्याची माहिती पुढे आली आहे. संवर्ग एकमध्ये प्रामुख्याने दिव्यांग शिक्षक, गंभीर आजाराने ग्रस्त असलेले शिक्षक, तसेच वयाची 53 वर्षे उलटलेल्या शिक्षकांचा समावेश होतो.
यूडायसच्या आकडेवारीनुसार, राज्यात सरकारी शाळांमध्ये एकूण 2 लाख 28 हजार 491 शिक्षक आहेत. त्यातील 93 हजार 339 हे प्राथमिक आणि 1 लाख 12 हजार 670 हे उच्च प्राथमिक स्तरावरील आहेत. या दोन लाख शिक्षकांपैकी तब्बल 43 हजार शिक्षक दिव्यांग किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याचे आता बदली प्रक्रियेत पुढे आले आहे.
एवढ्या मोठ्या संख्येत शिक्षक आजारी असतील तर त्याचा अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होत नाही का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. ‘संवर्ग एक’मधून बदलीसाठी अर्ज भरणाऱ्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पंचायत समिती स्तरावर पडताळणी केली जात आहे. या पडताळणीतून सुटका व्हावी, यासाठी याच शिक्षकांनी राजकीय 'फिल्डिंग' लावल्याची देखील चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.