Maharashtra Drought News : राज्यात यंदा एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे मान्सून पूर्णपणे विस्कळीत झाला असून जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी महाराष्ट्रातील जलसंकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सध्या राज्यात 1200 हून अधिक टँकरच्या माध्यमातून तब्बल 22 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
राज्यातील (Maharashtra) हवामानात सध्या विचित्र बदल दिसत आहेत. दुपारच्या वेळेत कडक ऊन, तर सायंकाळनंतर अचानक वेगवान वादळी वारे अशी परिस्थिती निर्माण होत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, या वादळी वार्यांमुळे पावसाच्या ढगांच्या हालचालींवर परिणाम होत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडतो, तर अनेक भाग पूर्णपणे कोरडे राहत आहेत.
तीव्र उन्हाळा आणि दीर्घकाळ पाऊस न झाल्याने राज्यातील अनेक गावांतील विहिरी, बोअरवेल आणि स्थानिक जलस्रोत (Water Crisis) कोरडे पडले आहेत. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ग्रामीण भागात नागरिकांसह पाळीव जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध विभागांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात 415,पुणे विभाग 292, नाशिक 185, कोकण 177, अमरावती 95 आणि नागपूर विभागात 34 टँकरद्वारे पाणी सुरू आहे. स्थानिक पाणीस्थिती, पावसाचे प्रमाण आणि वाढती मागणी यानुसार या संख्येत सातत्याने बदल होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील जलस्थितीबाबत माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी याआधीच परिस्थितीचा अंदाज घेत धरणातील पाणी ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखून ठेवण्याचे नियोजन केले होते. मात्र आता परिस्थिती गंभीर बनत असल्याने पाणीसाठा सप्टेंबरपर्यंत टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एल निनोचा परिणाम अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर दिसत आहे. काही भागांत पाऊस होत असल्याने आशा कायम असली, तरी धरणांच्या लाभक्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुढील दोन महिन्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन सरकार करत आहे.
कृत्रिम पाऊस पाडण्याच्या पर्यायावर सरकार विचार करत आहे का, असा प्रश्न विचारला असता मंत्री विखे पाटील म्हणाले की, तज्ज्ञांशी याबाबत चर्चा होऊ शकते. हवामान बदलाचे परिणाम आता संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. त्यांनी युरोपमधील वाढत्या तापमानाचा दाखला देत चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, वाढते शहरीकरण, झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल आणि काँक्रीटच्या जंगलामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. वर्षानुवर्षे बिल्डरकेंद्री धोरणे राबवली गेली, पण आता शहरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
राज्यात मान्सून सक्रिय होऊन धरणे, तलाव, विहिरी आणि भूजलसाठे भरून येईपर्यंत अनेक जिल्ह्यांना टँकरवरच अवलंबून राहावे लागणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामानातील अनिश्चितता आणि एल निनोचा वाढता प्रभाव पाहता येत्या काही आठवड्यांत महाराष्ट्रातील जलसंकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.