Vidhan Bhavan Mumbai  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Politics: खासदाराला पराभूत करणाऱ्या 'या' मतदारसंघात उमेदवारीसाठी सर्वच पक्षात रस्सीखेच

Sampat Devgire

लोकसभा निवडणुकीत एकट्या मालेगाव मध्य मतदारसंघाने काँग्रेसला विजय मिळवून दिला. मात्र विधानसभेला ही चाल उलटी पडण्याची शक्यता आहे. मतदारसंघ कोणाला यावरून महाविकास आघाडीत ओढाताण होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव मध्य मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. हमखास विजय देणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेस पुढे नेतृत्वाची वाणवा आहे. इच्छुकांमध्ये राजकीय झेंडा निवडताना गोंधळ झाला.

लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना पाडायची हिम्मत दाखवणारा मालेगाव मध्य हा मतदारसंघ आहे. पाच मतदारसंघातून मायनसमध्ये जाऊनही एकट्या मालेगाव मध्यने काँग्रेसच्या उमेदवाराला 1 लाख 21 हजाराचं लीड दिलं देत आणि भामरे यांचा पराभव केला. ही मालेगाव मध्य मध्ये मतदारांची ताकद आहे. त्यामुळे आता विधानसभेत कुणाची ताकद वाढणार, याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

इच्छुक उमेदवारांना येत्या निवडणुकीत एकमेकांशीच झुंजावे लागणार आहे. त्यामुळे आघाडीतील मतभेदांचा हा वाद पुन्हा एकदा एमआयएमच्या पथ्यावर पडणार, अशी स्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन इच्छुकांमधील वादात आमदार मौलाना मुक्ती यांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार का?अशी स्थिती मालेगावात आहे.

मालेगाव शहर अर्थात मध्य मतदारसंघ यंत्रमागाशी निगडीत आहे. हजारो कामगार यंत्रमागावर अवलंबून आहेत. सुताचे काम करणारे हे कामगार प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहार येथून आलेले आहेत. त्यांना 'अन्सारी' असे संबोधले जाते. या अन्सारी समाज घटकांचे शहरावर वर्चस्व आहे. स्थानिक दखनी आणि अन्सारी यांच्यात निवडणुकीत राजकीय वर्चस्वाची लढाई असते. यामध्ये सध्याचे आमदार मौलाना मुक्ती हे 'अन्सारी' वर्गात मोडले जातात.

अन्य इच्छुक उमेदवारांत काँग्रेसचे एजाज बेग, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारीची तयारी करणारे माजी आमदार आसिफ शेख आणि समाजवादी पक्षाचे मुस्तकीन डीग्निटी हे तिन्ही उमेदवार दखनी वर्गात मोडतात. त्यामुळे एमआयएम पक्षाकडून मौलाना मुक्ती हे एकमेव उमेदवार आहेत. त्यांची उमेदवारी देखील जाहीर झाली आहे.

महाविकास आघाडीत जागावाटप कोणाला आणि उमेदवार कोण? याबाबत गोंधळ आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून समाजवादी पक्षाला भिवंडी आणि मालेगाव हे मतदारसंघ हवे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथे दोन लाख दहा हजार मतदान झाले. यातील एक लाख 98 हजार काँग्रेसच्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांना झाले. काँग्रेसचा उमेदवार उर्वरित पाचही मतदार संघांमध्ये पिछाडीवर असताना मालेगाव शहरामुळे विजयी झाला.

यामध्ये सर्वच पक्षाचे कार्यकर्ते भाजप विरोधात एकत्र आले होते. त्यामुळे काँग्रेसला लाभ झाला. मात्र काँग्रेसच्या या परंपरागत मतदार संघात त्याचे सहकारी पक्षच उभे ठाकले आहेत.

काँग्रेसकडून एजाज बेग इच्छुक आहेत. येथील जुने नेते (कै) निहाल अहमद यांची कन्या शानेहिंद आणि जावई मुस्ताक डिग्निटी हे समाजवादी पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहेत. हा वाद लक्षात आल्याने माजी आमदार असिफ शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला आहे ते अपक्ष उमेदवारी करणार आहेत या स्थितीत मालेगाव मध्ये मतदारसंघात तिरंगी लढत अटळ आहे.

त्यामुळे जागा वाटपात मालेगाव मध्य मतदार संघ काँग्रेसला मिळणार की नाही येथूनच वादाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना अपक्षांचे आव्हान मिळेल. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारातील वादाचा फायदा एमआयएम पक्षाचे मौलाना मुक्ती यांना होईल का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT