Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange : पाडापाडी मस्त असते, 113 आमदार नक्कीच पाडू; 'ओबीसी'तून आरक्षण घेण्याचा मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Pradeep Pendhare

Ahmednagar News : "मी रोज 4-4 सलाईन घेतोय, मरण यातना भोगतोय. पण मला माझ्या यातनांची व शरीराची चिंता नाही. मराठा समाजाच्या वेदना मी जाणतोय. त्यामुळे सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी हटत नाही", असा निर्धार मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी नगरमध्ये व्यक्त केला.

29 ऑगस्टला विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे की मराठा आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांना पाडायचे याचा निर्णय घेणार आहोत. उभे करण्यापेक्षा पाडापाडी मस्त असते, 113 आमदार नक्कीच पाडू, असा इशारा मनोज जरांगेंनी राज्यकर्त्यांना दिला.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे आणि सगेसोयरे कायदा निर्णय व्हावा यासाठी मनोज जरांगे राज्यभरात शांतता रॅली आयोजित केल्या आहेत. नगरमध्ये सोमवारी ही रॅली झाली. नगर शहरातील जुन्या बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जरांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅली चौपाटी कारंजावर येथे येत सभा झाली. मनोज जरांगे यांनी तब्बल तासभर केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि छगन भुजबळ यांच्यावर घणाघात केला.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) बलिदान केलेल्यांच्या घरात गेले की अंगाची आग होते. त्या कुटुंबीयांचे दुःख पाहवत नाही. त्यामुळे समाजासाठी बलिदान केलेल्याच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे मराठा समाजाने कोणत्याही पक्षाला आणि नेत्याला मानू नये. समाज आणि समाजाची लेकरे यासाठीच एकत्र यावे. तुमची मान खाली जाईल, असे माझ्याकडून काहीही होणार नाही. माझ्या नंतरही ही लढाई चालू राहिली पाहिजे. समाज एक होण्याचा विचार संपला नाही पाहिजे. मी मरेपर्यंत ताठ मानेने जगेल. समाजाला दिलेल्या शब्दाला डाग लागू देणार नाही. मी क्षत्रिय मराठा आहे. गद्दारी करणार नाही आणि सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही, अशी गर्जना मनोज जरांगे यांनी केली.

फडणवीस आणि भुजबळ यांना दंगली घडवणार

देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना दंगली घडवायचे आहेत, असा आरोप करत ओबीसी आणि मराठा समाजमध्ये काहीही वाद नाही. परंतु दोन्ही समाजात गैरसमज पसरवून त्यांना वाद वाढवायचे आहे. त्यामुळे आपण शांत राहायचे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

113 आमदार नक्कीच पाडू

29 ऑगस्टला विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे की मराठा आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांना पाडायचे याचा निर्णय घेणार आहे. उभे करण्यापेक्षा पाडापाडी मस्त असते. लोकसभेला त्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. आपण पडायचे ठरवले, तर यांचे 113 आमदार नक्कीच निवडून येणार नाहीत. फक्त उभे करायचे ठरवले, तर जो उमेदवार असेल, त्याच्याशी जमत नसले, तरी त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे काम समाजाने केले पाहिजे. मुंबईत नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने सतरा ते अठरा टक्के मराठा समाज आहे. त्यामुळे मुंबईतील 19 जागांचा कार्यक्रम आपण नक्कीच करू शकतो, असा दावाही मनोज जरांगे यांनी केला.

विधानसभेत नावे घेऊन पाडणार

लोकसभा निवडणुकीत मी फक्त पाडा म्हटले होते. कुणाची नावे घेतली नव्हती. मात्र आता विधानसभा निवडणुकीत नावे घेऊन पाडण्याचे सांगणार आहे. महायुती व महाविकास आघाडी हे कोणीही मराठा आरक्षणाच्या बाजूने नाहीत. आपल्याला विरोध करायचा म्हणून त्यांच्यातली भांडणे सोडून ते आपल्या विरोधात एक झाले आहेत. त्यामुळे यावेळी पाडायचे आदेश झाल्यानंतर दणादण पाडायचे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT