Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : काहीही बोलणार्‍या भुजबळांनी लायकी सोडलीय; मनोज जरांगेंचे टीकास्त्र

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौर्‍यावर असलेले मनोज जरांगे पाटील यांची संगमनेर येथील जाणता राजा मैदानात आज रात्री सभा झाली. या सभेत जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

'येथून पुढे व्यक्ती म्हणून त्यांना विरोध आहे. मी शांत बसलो होतो. मात्र माझ्या नादी लागल्याने मग त्यांना कसे सोडणार ? आतमध्ये गेले आणि बेसन भाकरी खावून आले. वय झाल्यामुळे ते काहीही बोलून त्यांनी त्यांची लायकी सोडलीय', अशा शब्दात जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांचा नाव न घेता समाचार घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही, मग माझा जीव गेला तरी मी मागे हटणार नाही. मी तुमच्या जीवावर जिवाची बाजी लावत आहे. मला तुमची साथ कमी पडून देवू नका. आपण सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेवू, असा सज्जड इशारा देत जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.

जरांगे पाटील म्हणाले, "आता त्यांचे वय झाले आहे. त्यामुळे ते काही बोलत आहेत. लायकी होती ती त्यांनी सोडली आहे. वैचारिक मतभेत असले पाहिजेत. 30 वर्षे सत्ता भोगली. आता तेच कायदा पायदळी तुडवत आहे. आता इथून पुढे व्यक्ती म्हणून त्यांना विरोध आहे. आतमध्ये गेले आणि बेसन भाकरी खावून आले आहेत."

"मराठ्यांनी ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी कधीच विरोध केला नाही. मात्र आज तेच लोक मराठ्यांच्या विरोधात आहेत. आज आरक्षणाची गरज पडली, तर मराठ्यांच्या पाठिशी कोणी नाही. सत्तर वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते, तर आमचीही मराठा समाजाची मुले आयपीएस अधिकारी असते. पण तसे झाले नाही," असेही जरांगे पाटील म्हणाले.

'मराठा आरक्षणासाठी मी मरेपर्यंत लढा देईल. माझ्या मराठा समाजाशी गद्दारी करू शकत नाही. आतापर्यंत मराठ्यांचा विश्वासघात झाला असून त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही, त्यांचे नाव आम्हाला कळू द्या. या राज्यात 32 लाख मराठा नोंदी आरक्षणात असलेल्या सापडल्या असून कुणबी प्रमाणपत्रही देण्याचे काम सुरू झाले. 70 वर्षांपूर्वीच आपल्याला आरक्षण होते. मात्र ते कधीच समजावून दिले नाही,' असा घणाघातही जरांगे पाटलांनी केला.

राज्यातील मराठा एक झाला आहे. त्यामुळे आता सरकारला दखल घ्यावी लागत आहे. आरक्षण नसल्याने आतापर्यंत अनेकांचे जीव गेले, तर काहींना नोकरीत आरक्षण नाही. आरक्षण हा आमचा हक्क आहे म्हणून आम्ही तुमच्याशी भांडत आहोत. सरकारने 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागितला आहे. मराठा समाज मागास सिद्ध झाला असताना आरक्षण नाही. विदर्भातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आणि महाराष्ट्रातील मराठ्यांना नाही, असेही शेवटी त्यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT