Dhananjay Munde sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Beed Murder Case : माजी पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने कायदा धाब्यावर बसवला? हकालपट्टी करा; बीडनंतर आणखी एका जिल्ह्याची मागणी

Dhananjay Munde Politics : संतोष देशमुख हत्याप्रकरणाची धग अख्या राज्यभर पसरत असून मंत्री धनंजय मुंडे यांच्या हाकालपट्टीच्या मागणीला जोर धरल आहे. बीडकरांनी याआधीच अशी मागणी करताना त्यांनी मंत्रिपदच देऊ नये असे म्हटले होते.

Aslam Shanedivan

Malegaon Protest News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजत असून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनातून आरोपींनी कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. अशातच आता मालेगावकरांनी देखील आता देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना मंत्री धनंजय मुंडे यांच्या हाकालपट्टीची मागणी केली आहे.

मालेगाव येथील मराठा समाजाचे कार्यकर्त्यांनी, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावर सरकारला घेरलं आहे. समाजाने, या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड असून त्याने काल पोलिसांकडे शरणागती पत्करली. मात्र गेली २५ दिवस त्याला कोण संरक्षण देत होता? असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच राज्य शासन वाल्मीक कराडला वाचविण्यासाठी आटापिटा करत असल्याचा आरोप मराठा समाजाने निवेदनातून केला आहे.

सध्याचे पोलीस हतबल असून ते प्रचंड राजकीय दबावाखाली आहेत, असे पोलीस अधिकारी गुन्हेगारांना हात लावण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत. त्यामुळे पोलिसांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. याची पोलिसांनीही दखल घ्यावी, असे आवाहन देखील मराठा समाजाने केले आहे.

सध्या बीडमध्ये प्रचंड अराजकता माजली असून अनेक लोकांचे खून झाले आहेत. कायदा धाब्यावर बसविण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार पेक्षाही वाईट स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. मंत्री धनंजय मुंडे हेच या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे या सर्व प्रकारांना त्यांचे उघड समर्थन आणि पाठिंबा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचा दावा देखील समाजाने केला आहे. यामुळे मुंडे यांनी तातडीने राजीनामा देणे आवश्यक आहे. त्यांनी राजीनामा न दिल्यास राज्य शासनाने त्यांची तातडीने हकलपट्टी करावी. त्यांची देखील चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

वाल्मिक कराड हा नुकताच पोलिसांना शरण आला मात्र तो २५ दिवस कोठे होता. त्याला पोलिस का पकडू शकले नाहीत? राज्य शासनाचे वाल्मीक कराडला संरक्षण होते का? असे सवाल करताना, एका प्रामाणिक आणि जनतेच्या कामासाठी झटणाऱ्या संतोष देशमुख या सरपंचाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. जे महाराष्ट्राला लाजिरवाणे असल्याचेही निवेदनातून म्हटले आहे.

अफगाणिस्तान आणि तालिबान हे देखील अशा पद्धतीचे कृत्य करत नाही त्यामुळे राज्य शासनाने विना विलंब धनंजय मुंडे यांचे हकालपट्टी करावी. वाल्मीक कराड याची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी. ही सर्व संपत्ती देशमुख यांच्या कुटुंबीयांना देण्यात यावी. राज्य शासनाकडून मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना पाच कोटी रुपयांची मदत देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

तर या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २६ जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे मालेगाव कर संतोष देशमुख हत्त्या प्रकरणाच्या विरोधात एकवटले असल्याचे चित्र दिसले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT