Manoj Jarange Patil, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : "...अन्यथा गुलाल लागू देणार नाही," जरांगे-पाटील सरकारवर गरजले

Sampat Devgire

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी सरकारला पुन्हा गंभीर इशारा दिला आहे. "आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाचे प्रश्न निकाली काढा, अन्यथा गुलाल लागू देणार नाही," असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे.

नाशिकमधील सकल मराठा समाजाचे विलास पांगारकर यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांच्या निवासस्थानी जरांगे-पाटलांनी ( Manoj Jarange Patil ) भेट दिली. अचानक जरांगे-पाटील नाशिकमध्ये आल्यानं कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांचीही धावपळ उडाली.

"सगेसोयरेबाबतचा अध्यादेश तातडीने काढावा"

जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणाले, "आश्वासन आणि लिखित पत्र देऊनही सरकार आपला शब्द फिरवत आहे. त्याची किंमत त्यांना येत्या निवडणुकीत मोजावी लागेल. आज निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणाचे प्रलंबित विषय आणि सगेसोयरेबाबतचा अध्यादेश तातडीने काढावा, अशी आमची अपेक्षा आहे. तसे न झाल्यास त्याचे परिणाम राज्य सरकारला येत्या निवडणुकीत दिसून येतील."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मराठा आरक्षणाची सरकारनं चेष्टा केली"

"मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीत व्यस्त आहेत. मराठा समाजाला डावलून त्यांना निवडणुकीत जाता येणार नाही. सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाची राज्य सरकारने अक्षरश: चेष्टा केली आहे. ज्यांना आम्ही मोठे केले त्यांच्यापासूनच आम्हाला अपेक्षा आहेत. आतापर्यंत साडेतीनशे युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. समाज बांधव रस्त्यावर आहेत. महिला आंदोलन करीत आहेत. मात्र, राज्यकर्त्यांना केवळ सत्ता आणि स्वार्थ दिसत आहे," अशी टीका जरांगे-पाटलांनी केली.

"आर्थिक स्वार्थामुळे सरकारला समाजाचे दु:ख दिसत नाही"

"राज्यकर्त्यांचा जीव फक्त सत्तेत आहे. सत्तेतून निर्माण होणाऱ्या आर्थिक आणि अन्य लाभाच्या चक्रांमध्ये ते गुंतले आहेत. या स्वार्थामुळे त्यांना समाजाचे दुःख दिसत नाही. जनतेचे प्रश्न समजत नाहीत. त्यांना हा समाज आणि जनता येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल. निवडणुकीचा गुलाल हा राज्यकर्त्यांचा जीव असतो. कोणत्याही राजकारण्याला आणि मराठा आरक्षण नाकारणाऱ्यांना येत्या निवडणुकीत गुलालच घेता येणार नाही. अशी व्यवस्था समाजाने करावी म्हणजे या राज्यकर्त्यांना आणि राज्य राजकारण्यांना त्यांची जागा कळेल. मराठा समाज जागृत झाला आहे. त्यामुळे तो आता मराठा आरक्षण नाकारणाऱ्यांना गुलाल लागू देणार नाही," असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT