Radhakrishna Vikhe Patil | Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil | Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe News : मंत्री विखेंनी थोरातांना सुनावले, विरोधकांना आमची चिंता कशाला?

Sachin Waghmare

Nagar News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने १६ राज्यातील १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात महाराष्ट्राचा समावेश नाही. यावर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी टायमिंग साधत भाजपवर खोचक टीका केली होती. यावर भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. 'विरोधी पक्षाला आमची चिंता कशाला आहे, हेच कळत नाही', असे मंत्री विखे यांनी म्हटले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगरमधील उपकेंद्राच्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री विखे यांनी काॅंग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. काही दिवसांनंतर मूळ भाजपवाल्यांना त्यांच्या पक्षात आरक्षण घ्यावे लागेल आणि महायुतीत हाणामारी सुरू असल्याने महाराष्ट्रातील एकाचाही पहिल्या यादीत समावेश नव्हता, अशी टीका आमदार थोरात यांनी केली होती. (Minister Radhakrishna Vikhe told balasheb Thorat, why are the opposition worried about us news)

मंत्री विखे म्हणाले, "विरोधी पक्षाला आमची चिंता कशाला आहे. उमेदवारांची यादी जाहीर होईल. एकमताने महायुतीचे उमेदवार जाहीर होतील. ४५ प्लसचा आकडा महायुती महाराष्ट्रात पार करेल". काही दिवसानंतर मूळ भाजपवाल्यांना आरक्षण द्यावे लागेल, या टीकेवर बाळासाहेब थोरातांना इकडे येताना तोच विचार करावा लागले. भाजपच्या लोकांना आरक्षण दिल्यावर मला संधी कशी मिळणार याचा विचार ते करत असणार. आरक्षणाचा मुद्दा पक्षातंर्गत सोडवायचा आहे, म्हणजे मला पक्षात आल्यानंतर संधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा असेल, असे खोचक प्रत्युत्तर मंत्री विखे यांनी थोरात यांना दिले.

लोकसभेसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तुमचे देखील नाव चर्चेत आहे, यावर मंत्री विखे म्हणाले, 'भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. अनेकांची नावे चर्चेत आहेत. मुलाखती झाल्या आहेत. निरीक्षक येऊन गेले आहेत. अहवाल सादर झाला आहे. भाजपची केंद्रीय मुख्य निवडणूक यंत्रणा नावे जाहीर करतील". महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. थोडा वेळ लागेल. यापेक्षा मी अधिक भाष्य करणे उपयुक्त ठरणार नाही, असेही मंत्री विखे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाच्या प्रश्नांवर राजकारण करणे बंद करा ः मंत्री विखे

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vaddetivar) यांनी महायुती सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. यावर मंत्री विखे म्हणाले, "मला वाटत नाही. हे राजकीय आरोप आहेत. दहा टक्के आरक्षण दिलेले आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेने ते मान्य केलेले आहे. विजय वडेट्टीवारांना असे वाटत असेल, तर ते विरोधी पक्षनेते होते. त्यांनी सभागृहात सांगितले पाहिजे. तेव्हा तर ते म्हणाले, एकमताने ठराव करा. आता कोणती उपरोधिक ठरली. मराठा समाजाच्या प्रश्नाचे राजकारण करणे बंद केले पाहिजे. आरक्षण मिळाले, ते योग्य आहे. ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकले पाहिजे. ती सगळ्यांची जबाबदारी आहे".

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा विषय समाजावून घेतला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे मुख्यमंत्री असताना कायद्याच्या चाकोरीत मराठा आरक्षण बसवले आणि सर्वोच्च न्यायालयात ते टिकले. परंतु अडीच वर्षे ज्यांनी घरातून सरकार चालवले. त्यांना महाराष्ट्र समजाला नाही. फेसबुकवरून राज्य चालत नाही. फेसबुकवरून महाराष्ट्र सरकारच्या भावना कळणार नाही. दुर्दैवाने महाराष्ट्राने भोगले ते अडीच वर्षे. त्याचा हा परिणाम आहे. आता आपण आरक्षण दिले आहे आणि ते टिकेल, असे मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn vikhe) यांनी म्हटले.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT