Anna Hazare On Jitendra Awhad  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anna Hazare On Awhad : आमदार जितेंद्र आव्हाडांना 'ते' ट्विट भोवणार; अण्णा हजारे अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

Deepak Kulkarni

Ahmednagar Political News : ठाकरे गटाची धडाडती तोफ आणि खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच मणिपूरच्या घटनेवरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर टीकेची झोड उठवली होती. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारेंवर हल्लाबोल केला आहे.

आव्हाड यांनी हजारे यांचा फोटो ट्विट करत 'या व्यक्तीमुळे देशाचे वाटोळे झालं,टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही' असं म्हणत टीकेची तोफ डागली होती.मात्र, आता आव्हाडांना ही टीका भोवण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी आव्हाडांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही दिला आहे. हजारे म्हणाले,माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं नाही, तर माझ्या आंदोलनामुळे अनेक देशहिताचे कायदे झाले. मी देशभरात फिरत असताना माहिती अधिकार कायद्याबाबत लोक मला चांगल्या प्रतिक्रिया देतात.पण अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचं वाटोळे झालं असल्याचं नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले.

आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत टीका केल्यानंतर आता अण्णा हजारेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी वकिलांचा सल्ला घेऊन आव्हाडांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे हजारे यांनी सांगितले आहे.

आव्हाड ट्विटमध्ये नेमकं काय...?

केंद्रातील काँग्रेस सरकारविरोधात रामलीला मैदानावर ऐतिहासिक आंदोलन करणाऱ्या अण्णा हजारेंनी देशात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यापासून एकही आंदोलन केलेले नाही.यावरुन महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून सातत्याने हजारेंवर सडकून टीका केली जाते.

याचवरुन आता आमदार आव्हाड यांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका करणारी ट्विट केली होते. यात त्यांनी हजारेंवर निशाणा साधतानाच'या व्यक्तीमुळे देशाचे वाटोळे झालं,टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही' असं म्हणत हल्लाबोल केला होता.

"...पण अण्णा हजारेंनी कोणतीही भूमिका घेतली नाही!"

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनीही अण्णा हजारेंवर टीका केली होती.ते म्हणाले, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत,त्यांच्याविरोधात अण्णा हजारे यांनी आपली भूमिका जाहीर करून एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत.

मणिपूर विषयावरती अख्खा देश जागा झाला आहे, पण त्यावर अण्णा हजारे यानी कोणतीही भूमिका घेतली नाही, एक शब्दही बोलले नाहीत. आम्ही वाट बघत होती अण्णा कधी बोलणार असा सवालही राऊतांनी उपस्थित केला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT