Uddhav Thakrey
Uddhav Thakrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`मनसे पॅटर्न`ने केला शिवसेनेचा घात?

Sampat Devgire

नाशिक : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाच्या झेंड्यानंतर नाशिक (Nashik) ते थेट राजधानी मुंबईतील राजकीय घडामोडींचे विश्‍लेषण सुरु झाले. राज ठाकरे यांच्या नाशिक महापालिकेतील (NMC) सत्तेच्या काळात कामांचा धडाका उडाला होता. मात्र त्या कामांचे श्रेय राज यांना का मिळाले नाही? त्याचे कारण म्हणजे, त्यांनी जबाबदारी सोपविलेले पक्षाला सोडून गेले. (Leaders leave Shivsena whenever party give posts)

आताही तशीच गत शिवसेनेची झालीय. विधिमंडळ गटनेता, नगरविकासमंत्री आणि सोबत आमदारांना सांभाळणे अशा महत्त्वाच्या जबाबदारी दिलेले श्री. शिंदे यांनी मुंबई सोडून आपल्या समर्थक आमदारांसोबत थेट सूरत गाठले.

नाशिकमध्ये शिवसेनेचे राजकारण आणि संघटन असे दोन वेगवेगळे भाग राहिल्याचे आजवरच्या वाटचालीवरून पाहावयास मिळते. त्यामुळे महापालिकेतील सत्ता असो, की आमदार आणि खासदार हे एकीकडे आणि संघटनात्मक बांधणी एकीकडे अशी राजकीय वाटचाल शिवसेनेची राहिली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आगामी काळात शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणावर पुन्हा पकड घट्ट करायची असल्यास संघटनात्मक बांधणी करत असताना दुसरीकडे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढवावा लागेल, असे पक्षाच्या राजकीय वाटचालीत योगदान देणाऱ्यांना वाटते आहे.

शिवसेनेतील फेरबदलांमध्ये संघटनेचे ऐकले गेले नसल्याचे काय किंमत मोजावी लागले, याकडे पक्षांतर्गत अंगुलिनिर्देश करण्यात येत आहे. देवळाली, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, निफाड मतदारसंघात पक्षाला फटका बसला. त्यामुळे नांदगावचे सुहास कांदे आणि मालेगाव बाह्यचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्यावर पक्षाला समाधान मानावे लागले.

आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तोंडावर राजकीय गदारोळ उडाला असला, तरीही महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांमधील ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशहून महाराष्ट्राचे राजकारण वेगळे असल्याने गोंधळ घालणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल.

मुंबईसह राज्याच्या विविध भागात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन मुख्यमंत्र्यांना दिलेले समर्थन त्याचे प्रतीक असल्याचे दिसते. एवढेच नव्हे, तर आताच्या राजकीय गदारोळात विधानसभेच्या सभापतींकडे खातरजमा करण्यासाठी आमदारांना बोलवावे लागेल. अशावेळी कार्यकर्ते जागेवर असल्याने राजकीयदृष्ट्या पळता भुई थोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंडातून स्थानिक काय शिकलेत?

शिवसेनेच्या आजवरच्या बंडातून स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय शिकलेत हेही महत्त्वाचे आहे. पालकमंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यावर पक्षाला धक्का बसला. मात्र गणेश नाईक आणि राज ठाकरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यावर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला धक्का बसला नव्हता. या आठवणींना आता उजाळा दिला जात आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील भूमिकेनंतर काय स्थिती राहील, यासंबंधीच्या तर्कवितर्कांना शिवसेनेत उधाण आले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT