Supriya Sule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MP Supriya Sule : भाजपकडून मित्रपक्षांच्या नैतिकतेवर अविश्वास; सत्ताधार्‍यांमुळे तेढ वाढल्याचा सुप्रिया सुळेंचा टोला !

Pradeep Pendhare

Nagar News : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्यांच्याच मित्रपक्षांवर होत असलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. भाजपकडून होणारी टीका पाहता ते आपल्या मित्रपक्षांच्या नैतिकतेवर अविश्वास दाखवत असल्याचा खासदार सुळे यांनी लगावला.

जबाबदार व्यक्तींच्या भाषणांमुळे व वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत व त्यात सत्ताधार्‍यांचेच योगदान आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी नगरला आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.माजी महापौर अभिषेक कळमकर, डॉ.अनिल आठरे व अन्य यावेळी उपस्थित होते. भाजप कोअर कमिटी बैठकीत अजितदादा गट व एकनाथ शिंदे गटाने लोकसभेला मदत केली नसल्याचा दावा केला गेला.

यावर भाष्य करताना खासदार सुळे म्हणाल्या, 'भाजप नेत्यांची वक्तव्ये वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून मित्रपक्षावर टीका करणे वा त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका कशी होईल, हे पाहणे भाजपकडून सातत्याने सुरू आहे. यातून त्यांच्याच मित्रपक्षांच्या नैतिकतेवर (मॉरल डाऊन करणे) एकप्रकारे अविश्वास व्यक्त करण्यासारखे आहे. पण हा त्यांच्या आघाडी वा युतीतील अंतर्गत प्रश्न आहे, असे स्पष्ट करून त्यांनी अधिक भाष्य टाळले.

जातीवाद,दंगली वा सामाजिक तेढ महाराष्ट्रात वाढत आहे. पण, केंद्रात भाजपचे सरकार आहे व याच सरकारचा गुन्हेगारी अहवाल सांगतो की,महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. जबाबदार व्यक्तींच्या भाषणांमुळे व वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत व त्यात सत्ताधार्‍यांचेच योगदान आहे.

खा. सुळे म्हणाल्या, मात्र, यामुळे मराठी माणसाचे व महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. पुणे शहरात गुन्हेगारी घटना वाढल्या असून, क्राईम कॅपिटल शहर झाले आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले शहर गुन्हेगारीसाठी देशात प्रसिद्ध होणे, हे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे अपयश आहे, असा दावाही खासदार सुळे यांनी केला.

वाघ नखांवरून जनतेची फसवणूक

विधानसभा डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे ब्रिटीशांकडून आणल्याचे सांगितले जात असले, तरी त्यातील जे खरे व सत्य आहे, तेच न सांगता लोकांची फसवणूक सुरू आहे,असा दावा करून खासदार सुळे म्हणाल्या, ज्या ब्रिटीश म्युझियमकडून सरकारने वाघ नखे आणली, त्याच म्युझियमने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना संबंधित वाघ नखे मूळ (ओरिजनल) आहेत की नाही, हे माहीत नसल्याचे पत्र पाठवले आहे.

यामुळे राज्य सरकारने संबंधित वाघ नखे खरी आहेत की नाही, हे स्पष्टपणे सांगावे. ही वाघनखे पाहण्यासाठी शाळांतील मुले अपेक्षेने जात आहेत. त्यामुळे भविष्यात जेव्हा ही वाघ नखे खरी नाहीत,हे स्पष्ट होईल,तेव्हा या मुलांची ती फसवणूकच ठरणार आहे, असा दावाही खा.सुळेंनी केला. दरम्यान, नीट असो वा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, ती पारदर्शी पद्धतीने व्हावी, अशी मागणी आम्ही संसदेत केली होती. पण त्यावर चर्चाही केली गेली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पूजा खेडकर प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा

पूजा खेडकर प्रकरणाविषयी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, 'राज्यात सध्या पाऊस, महागाई, गुन्हेगारी, भ्रष्टाचार असे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. पण रोज पूजा खेडकर विषयावर चर्चा सुरू आहे".सरकारने तीन आठवडे घ्यावेत व या विषयाचा एकदाच काय तो अहवाल करून तो जाहीर करावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.दरम्यान, डॉ.सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या ईव्हीएम मशीन तपासणीच्या मागणीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, सत्तेत असलेल्यांचाच ईव्हीएमवर विश्वास नसेल तर त्याची दखल न घेणे चुकीचे आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT