Damage to crops due to hail Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar News : गारपीटग्रस्त गावांचा निवडणुकांवर बहिष्कार ? शेतकरी उतरले रस्त्यावर..

राजेंद्र त्रिमुखे

Nagar News : गेल्या महिन्यात नगर जिल्ह्यात गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या गारपीटीची मोठी झळ पारनेर तालुक्याला बसली असून मुख्यत्वे कांदा पीक काची पूर्ण नासाडी झाली आहे. कांद्याबरोबरच गहू, टोमॅटो, फळबाग, भाजीपाला गारपिटीने नष्ट झाल्याने मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.

या परस्थितीत महसूल विभागाने केवळ पंचनाम्याची औपचारिकता केली, प्रत्येक्षात तातडीच्या नुकसान भरपाईची गरज असताना सरकार केवळ आश्वासने देत असल्याने पारनेर Parner तालुक्यातील शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे संपूर्ण खरीप वाया गेला. त्यानंतर रब्बीची पिके तुटपुंज्या पाण्यावर कशीबशी घेतली असताना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अचानक प्रचंड गारपीट झाली.

या गारपिटीने रब्बीच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या. या झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, या मागणीसाठी पारनेर तालुक्यातील जवळे, गांजीभोयरे, वडुले आदी गावातील गारपीटग्रस्त शेतकरी बेमुदत उपोषण आंदोलन करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू असले तरी प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

एकीकडे नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असताना सरकार मोठमोठी आश्वासन देत असले तरी प्रत्येक्षात आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर येत जवळे इथे रास्तारोको केला. यावेळी शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. केवळ पाहणी करून आणि पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकर्यांच्या समस्या सुटणार नसून यासाठी सरसकट एकरी आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गारपीटग्रस्त Hailstorm शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करत असतानाही प्रशासनाचा कोणताही अधिकारी आंदोलकांची भेट घेण्यास न आल्याने शेतकरी चांगलेच संतापले. आता गावागावात ग्रामसभेत येणाऱ्या लोकसभेसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ग्रामसभेत ठराव घेऊन तो राष्ट्रीय, राज्य निवडणूक आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना पाठवण्यात येईल, असे सामाजिक कार्यकर्ते रामदास धावटे यांनी सांगितले आहे.

बळीराजा चहूबाजूने संकटात..

पारनेर तालुक्यातील जवळे, गांजीभोयरे, वडुले परिसरात २६ नोव्हेंबरला जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली होती. यामध्ये शेतातील उभी पिके भुईसपाट झाली. यामध्ये शेतकऱ्यांचा कांदा, ज्वारी, गहू, फळबागा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यायला हवी, जनावरांना चारा नाही त्यात सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाले आहे.

त्यात इथेनॉल बंदी घातल्याने उसाचे भाव घसरण्याची शक्यता आहे अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आंदोलनामध्ये दहा गावच्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता शासनाने वेळेत मदत केली नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा ठराव करून तो शासनाला पाठवला जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लंके-औटींनी केली होती नुकसानीची पाहणी..

पारनेर तालुक्यात 26 नोव्हेंबरला झालेल्या प्रचंड गारपीटी नंतर दुसऱ्याच दिवशी सकाळीच आमदार निलेश लंके यांनी शेतांवर जात झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर माजी आमदार विजय औटी यांनीही तालुक्यातील विविध गावांना भेटी देत नुकसानीची पाहणी केली नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना एकरी मदत द्यावी यामध्ये अनेक फळ शेतीचा समावेश नसलेल्या पिकांनाही मदत मिळावी, अशी मागणी सरकारकडे केली होती.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT