Nana Patole & Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nana Patole Politics: नाना पटोलेंचा अचूक नेम, निरूत्तर भाजप आरोपीच्या पिंजऱ्यात!

Sampat Devgire

Congress Vs BJP: विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रचार युद्ध कसे असेल, याची चुणूक आज दिसली. नंदुरबार येथे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर अचूक बाण सोडला. त्याचे भाजपकडे उत्तरच नसल्याने त्यांचा अक्षरशः तिळपापड झाला नाही तरच नवल.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. त्यासाठी विभागनिहाय आढावा बैठक होत आहे. गुरुवारी नंदुरबार येथे अशी बैठक झाली. त्याला पक्षाचे राज्यातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते.

प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या मेळाव्यात महायुतीवर अत्यंत तिखट हल्ला केला. राज्यातील महायुतीचे सरकार मुंबईत बसून गुजरातच्या हिताची काळजी घेत आहे. हे सरकार गुजरातसाठी काम करीत आहे.

याबाबतची असंख्य उदाहरणे आहेत. महाराष्ट्र हे स्वाभिमानी राज्य आहे. तसा त्याचा प्रदीर्घ इतिहास आहे. सध्या मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला तिलांजली देऊन सध्याचे सरकार दिल्ली समोर झुकले आहे.

महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार गुजरात लॉबीला शरण गेले आहे. त्यामुळे राज्यातील प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. जनतेच्या समस्यांविषयी त्यांनी डोळे झाकून घेतले आहेत. असे नेमके महायुतीच्या वर्मावरच बोट पटोले यांनी ठेवले.

महाराष्ट्र सरकार आणि गेल्या काही दिवसांमध्ये विविध आरोप होत आहेत. महायुतीचे सरकार त्याबाबत थातूरमातूर उत्तरे देण्यात व्यस्त असते. महाराष्ट्राचे प्रकल्प नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प, तापी खोऱ्यातील प्रकल्प, त्याद्वारे गुजरातला वाहून जाणारे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी अडविण्याकडे दुर्लक्ष, आदी विषयांचा त्यात समावेष आहे.

राज्यातील नादुरुस्त झालेले महामार्ग. असे विविध आरोप झाले आहेत. त्यावर राज्य सरकारला नेमकी भूमिका घेता आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या हल्ल्याने महायुती आणि विशेषता भाजपचा तीळपापड झाला नाही, तरच नवल. कारण त्यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही, असे सध्याचे चित्र आहे.

यावेळी श्री पटोले यांनी महायुती सरकारने राज्यापुढे निर्माण केलेल्या आर्थिक संकटावर प्रकाशझोत टाकला. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. सरकार त्यात रोज नवी भर घालते.

या कारभारामुळे महाराष्ट्र हे राज्यातील सर्वात महागडे राज्य बनले आहे. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. जनता महागाईत होरपळते आहे. यावर या सरकारकडे कोणताही उपाय नाही. हे सरकार बदलणे हाच त्यावर खरा उपाय आहे.

विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार आहे. तिसरा घटक आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका तळ्यात मळ्यातच दिसते आहे.

त्यामुळे तिसऱ्या आघाडीला किती उमेदवार मिळतील, याबाबत राजकीय तज्ञ साशंक आहेत. यातून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप प्रत्यारोप अर्थात विधानसभा निवडणुकीचे युद्ध कशाप्रकारे रंगेल याची चुणूक नंदुरबार येथील नाना पटोले यांच्या भाषणातून दिसली.

विधानसभा निवडणुकीत दोन्ही आघाड्यांच्या भात्यात एकमेकांवर सोडण्यात येणाऱ्या आरोपांचे बाण कसे असतील, याची देखील जाणीव होऊ लागली आहे.

या आढावा बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री के. सी. पाडवी, खासदार डॉ शोभा बच्छाव, नाना गावंडे, आमदार शिरीष नाईक, खासदार गोवाल पाडवी, आमदार शिरीष चौधरी, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे आदींसह विविध नेते उपस्थित होते.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT