Nashik APMC Division : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पेठ आणि त्र्यंबकेश्वर येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यासाठी शासनाच्या वतीने चौकशी समिती गठीत करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य पणन संचालनालयाने संबंधित आदेश काढले आहेत. त्या आधारे जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. या समितीला प्रत्येक मुद्द्याचा सखोल तपास करून आवश्यक कागदपत्रे व अभिप्राय जोडून एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती असावी अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीचे विभाजन करून पेठ आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नवीन समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेला वेग देण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करून शासनाला अहवाल सादर करण्याची जबाबदारी नियुक्त समितीवर सोपवण्यात आली आहे. पुढील टप्प्यात पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये नवीन बाजार समिती उभी करायची असल्यास तेथील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये नवी बाजार समिती स्थापन करायची असल्यास ती एकत्रित स्वरूपात असावी की प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र समिती उभारावी, याचा अभ्यास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध आहे का, शेतकऱ्यांना त्यातून प्रत्यक्ष लाभ होणार का, आर्थिक तरतूद कशी केली जाणार, उपबाजारांतील मालाची आवक-जावक व उलाढाल किती आहे, विद्यमान नाशिक बाजार समितीची मालमत्ता व कर्मचारी यांचे विभाजन कसे करायचे, अशा विविध बाबींचा सखोल आढावा घेण्याचे निर्देश दिले गेले आहेत. महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतुदींचा विचार करून या सात मुद्द्यांवर चौकशी करून, अभिप्रायासह वस्तुस्थितीदर्शक अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत.
पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या आपला माल विक्रीसाठी नाशिकला यावे लागते. पेठ ते नाशिक हे अंतर सुमारे ५५ ते ५८ किलोमीटर तर त्र्यंबकेश्वर ते नाशिक ३० ते ३५ किलोमीटर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, खर्च आणि श्रम मोठ्या प्रमाणावर वाढतात. जर नाशिक बाजार समितीचे विभाजन होऊन या दोन तालुक्यांत स्वतंत्र बाजार समित्या उभ्या राहिल्या, तर स्थानिक पातळीवरच व्यवहार करता येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या चौकशीसाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीमध्ये संदीप जाधव (उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका) यांना अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दीपक पराये (सहायक निबंधक, सहकारी संस्था, इगतपुरी) आणि वैभव मोरडे (सहायक निबंधक, सहकारी संस्था, दिंडोरी) हे सदस्य म्हणून कार्य करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.