Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : नाशिक कोणाचे यावर 29 तारखेला होणार फैसला?

Arvind Jadhav

Nashik Lok Sabha Election Politics :

नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा करीत शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ कोणाचा यावर 29 फेब्रुवारीपर्यंत निर्णय येण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व इच्छुकांचे महिन्याअखेरीकडे लक्ष लागले आहे. कोणत्या पक्षाला जागा सुटते, हे स्पष्ट झाल्यानंतरच लोकसभेचे घमासान खऱ्या अर्थाने सुरू होईल.

नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असून येथे शिवसेनेचे (शिंदे गट) हेमंत गोडसे हे खासदार आहेत. मागील दोन टर्मपासून जनमत आपल्या बाजूने घेणाऱ्या गोडसे यांनी तिसऱ्या टर्मसाठी जोरदार तयारी सुरू केली. मात्र, भाजपने या जागेवर हक्क सांगून शिवसेनेपुढे पेच निर्माण केला आहे. त्यामुळे अद्याप महायुतीने आपले पत्ते उघड केलेले नाहीत.

उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा आपल्याकडे घेण्याची रणनिती भाजपने आखली आहे. त्याअतंर्गत नाशिक लोकसभा मतदारसंघाची मागणी भाजपने केली आहे. यावर 29 तारखेपर्यंत निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली. विशेषत: शिवसेना पक्षाची ताकद कमी असल्याचा प्रचार भाजपने सुरू केला आहे. भाजपच्या या दाव्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी ही जागा भाजपकडे गेल्यास खासदार हेमंत गोडसे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

भाजपला ही जागा मिळणार हे गृहीत पकडून भाजपकडून सर्वाधिक इच्छुक रिंगणात उतरले आहे. भाजप इच्छुकांची गर्दी आणि सुरू झालेला प्रचार लक्षात घेता नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अजित पवार गटासह विरोधकसुद्धा या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपकडून उद्योजक अनिल जाधव, नाशिक लोकसभा मतदार संघाचे प्रमुख केदा आहेर, मविप्रचे अध्यक्ष नितीन ठाकरे, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, स्वामी विवेकानंद मिशनचे स्वामी कंठानंद, महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह अनेक नावे चर्चेत आहेत.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे, निवृत्ती अरिंगळे हे लोकसभा लढण्यास तयार आहेत. महाआघाडीतील शिवसेनेला हा मतदारसंघ सुटणार, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. शिवसेनेकडून विजय करंजकर हे मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांच्यासह जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड आदी इच्छुक आहेत. मात्र, महायुतीतील घटकपक्षांसह महाआघाडीचे लक्ष जागा कोणाला सुटणार याकडे आहे. 29 तारखेला ही स्थिती स्पष्ट झाल्यानंतर सर्वच इच्छुकांच्या लॉबिंगला धार मिळेल, अशी शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT