Devidas Pingle & Shivaji Chumbhale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik APMC Politics : नाशिक बाजार समितीचे विभाजन रोखण्यासाठी चुंभळे गटाची धावाधाव; दबावातून विभाजनाचा आरोप, CM फडणवीसांकडे जाणार

Nashik Market Committee Politics : नाशिक बाजार समितीचे ऐतिहासक विभाजन होऊन, विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. संचालक मंडळाने समितीचे विभाजन राजकीय दबावातून करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : राज्य शासनाच्या प्रत्येक तालुक्याला 'स्वतंत्र्य कृषी उत्पन्न बाजार समिती' या धोरणानुसार नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे ऐतिहासिक विभाजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता नाशिक, पेठ व त्र्यंबकेश्वर अशा तीन स्वतंत्र बाजारसमित्या अस्तित्वात आल्या आहेत.

या निर्णयामुळे विद्यमान संचालक मंडळ निष्प्रभावी झाले असून बरखास्त करण्यात आले आहे. तीन्ही बाजारसमित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्याने आता याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. नाशिक बाजार समितीच्या विद्यमान (सध्या बरखास्त झालेल्या) संचालक मंडळाकडून हे विभाजन रोखण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे.

नाशिक बाजारसमितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी पत्रकारपरिषद घेत याबाबत आपली भूमिका मांडली. सरकारविषयी आमची कोणतीही नाराजी नाही. परंतु बाजार समितीच्या विभाजनाचा निर्णय हा पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असून, पणन संचालकांवर दबाव आणून तो घेण्यात आल्याचा आरोप चुंभळे यांनी केला.

नाशिक बाजार समितीचे विभाजन करून पेठ व त्र्यंबकेश्वर या स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याच्या तसेच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी संचालक मंडळ लवकरच मुख्यमंत्री, तसेच सहकार व पणनमंत्र्यांची भेट घेऊन विभाजनाचा निर्णय रद्द करण्याची अथवा त्याला स्थगिती देण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिली. पत्रकार परिषदेला संचालक संपत सकाळे, राजाराम धनवटे, युवराज कोठुळे, संदीप पाटील, विनायक माळेकर आदी उपस्थित होते.

पेठ आणि त्र्यंबकेश्वर येथे स्वतंत्र जागा, आवश्यक भौतिक सुविधा, तसेच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसताना केवळ राजकीय हट्टापायी विभाजन करण्यात आल्याचा आरोप संचालक मंडळाने यावेळी केला. या नवीन बाजार समित्या भविष्यात ‘पांढरा हत्ती’ ठरतील आणि शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसेल. ही मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांची नसून, काही राजकीय नेत्यांच्या वैयक्तिक अजेंड्यातून पुढे आली असल्याचा आरोप संचालक मंडळाने केला.

नाशिक बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम असून नफ्यात असल्याचं चुंभळे म्हणाले. मागील काळातील सुमारे चार कोटी रुपयांची थकबाकी फेडून सध्या बाजार समितीकडे सुमारे ११ कोटी रुपयांची शिल्लक आहे. संस्थेवर कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराचा आरोप नसताना केवळ एका व्यक्तीच्या आग्रहाखातर नफ्यातील बाजार समितीचे विभाजन करण्यात आले. मालमत्ता व निधीच्या वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोपही चुंभळे यांनी केला.

बाजार समितीच्या एकूण १८ संचालकांपैकी पेठ व त्र्यंबकेश्वरचे चार संचालक सोडले तरी उर्वरित १४ पैकी ११ संचालक विद्यमान संचालक मंडळाबरोबर आहेत. त्यामुळे संचालक मंडळाकडे स्पष्ट बहुमत असतानाही आणि अजून २० महिन्यांचा कायदेशीर कार्यकाळ शिल्लक असताना प्रशासक नेमण्याचा निर्णय हा लोकशाही तत्त्वांना धरून नसल्याची भावना संचालकांनी व्यक्त केली.

माजी सभापतींच्या कथित गैरव्यवहारासंदर्भात पंचवटी पोलिस ठाण्यात पाच वेळा तक्रारी देऊनही एकाही तक्रारीची नोंद घेण्यात आली नसल्याची खंतही संचालक मंडळाने व्यक्त केली. यापूर्वी संचालक मंडळाने ठराव करून विभाजनाला विरोध केला होता. मात्र, सत्ता गेल्यावर विभाजनासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

योग्य वेळी संस्था वाचवली : पिंगळे

दरम्यान, माझ्या कार्यकाळात बाजार समितीची व्याप्ती तसेच उत्पन्नात वाढ केलेली आहे. या संचालक मंडळाने बाजार समिती भाडेपट्टा कराराच्या नावाखाली विकायला काढली होती. सरकारने योग्य वेळी विभाजन करीत संस्था वाचवल्याचं माजी खासदार देविदास पिंगळे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT