Deepika Chavan News: नाशिकच्या बागलाण आणि परिसरात गेल्या ४० दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत राज्य शासनाचे प्रशासन करते तरी काय? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
बागलाण या बागायती आणि पावसाच्या भागातच गेल्या ३० ते ४० दिवसांपासून दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. पाऊस नसल्याने शेतीची अवस्था बिकट झाली आहे. अनेक भागात जनावरे आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने पावले टाकावीत. या संदर्भात प्रशासनाने अहवाल पाठवावा, असे त्या म्हणाल्या.
बागलाण दुष्काळी जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे. अत्यल्प पावसामुळे खरीप पिके धोक्यात आहेत. इतर पिकांनाही भाव नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
जिल्ह्यात सर्वच्या सर्व आमदार सध्या महायुती सरकारचे आमदार आणि सत्ता आहे. मात्र शेतकरी संकटात असताना आणि दुष्काळ सदृश्य स्थिती असूनही सत्ताधारी आमदार कुठे आहेत? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कोणत्याही आमदाराने या प्रश्नावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेले नाही.
बागलाण तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगाम संकटाच्या गर्तेत सापडला आहे. जूनमध्ये अवघे चार-पाच दिवस पाऊस झाल्यानंतर तब्बल ३० ते ४० दिवसांच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून मका, बाजरीसह कांदा पिकांवरही मोठे संकट ओढवले आहे.
पावसाने अशीच ओढ दिल्यास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बागलाण तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी माजी आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्ता भरणे आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
महायुती सरकारकडून घोषणांचा पाऊस पडत असला, तरी प्रत्यक्षात शेतकरी मात्र हैराण आहे. त्याच्या शेतात पाण्याचा थेंबही नाही.बागलाणच्या शेतकऱ्यांना आणखी संकटात लोटण्यापूर्वी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांना फी माफी द्यावी; अन्यथा शेतकरी कुटुंबांवरील संकट अधिक गडद होईल, असा इशारा माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी दिला आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.