NCP MLA Anil Patil criticized Uddhav Thackeray  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anil Patil On Uddhav Thackeray: किती दिवस वडिलांच्या जिवावर मते मागणार? अनिल पाटलांचा ठाकरेंना सवाल

Mangesh Mahale

Jalgaon News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीला किमान दहा ते बारा लोकसभेच्या जागा मिळतील, असा दावा केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अनिल पाटलांनी टीका केली आहे. (NCP MLA Anil Patil criticized Uddhav Thackeray)

किती दिवस वडिलांच्या जिवावर मतं मागणार? असा खोचक सवाल अनिल पाटलांनी ठाकरेंना विचारला आहे. 'उद्धव ठाकरे यांनी कुठेतरी आपलं कर्तृत्व दाखवावं. वडिलांच्या जिवावर फार काळ राजकारण आपल्याला बघायला मिळणार नाही. 'राज्यात जनतेने आघाडीच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली होती, मात्र आपलं कर्तृत्व उद्धव ठाकरेंना दाखवता आलं नाही. उद्धव ठाकरे आपलं कर्तृत्व सिद्ध करा, वडिलांच्या जिवावर मतं मागू नका,'असा सल्ला त्यांनी ठाकरेंना दिला. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अनिल पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"राज्यात राष्ट्रवादीची ताकद पाहता किमान दहा ते बारा लोकसभेच्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीचा आग्रह आहे. लोकसभेच्या उमेदवारीबाबत पक्षाचे अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे निर्णय घेतील. अजित पवारांनी सांगितल्यास राज्यातील कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू. पक्षाने उमेदवारी न दिल्यास पक्षाचा प्रचार करीत राहील," असे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्यावरही अनिल पाटलांनी टीकास्त्र डागले. अजित पवारांच्या जवळची लोकं त्यांना फसवत आहेत, अशी टीका रोहित पवारांनी केली होती. त्याला अनिल पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले,"रोहित पवारांनी आपल्या अनुभवाचा विचार केला पाहिजे. दिल्ली फार लांब आहे, जेवढी पात्रता आहे तेवढेच त्यांनी बोलावं," केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवं निवडणूक चिन्ह दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सात दिवसांत शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाला चिन्हं देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयोगाने कार्यवाही करत गुरुवारी उशिरा पक्षाला तुतारी हे चिन्ह दिले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार'साठी (NCP) गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, खासदार शरद पवारांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकणार आहे!, असे पक्षाच्या वतीने म्हटले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT