Chhagan Bhujbal Vs Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhujbal Vs Raut: ''इतकं लक्ष जर शिंदे गट आणि त्यांच्या बॅगांवर ठेवलं असतं तर...''; भुजबळांनी राऊतांना डिवचलं

सरकारनामा ब्यूरो

Nashik : महाविकास आघाडीत मागील काही दिवसांपासून अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. ठाकरे गट. काँग्रेस, राष्ट्रवादी या तीनही पक्षाच्या नेतेमंडळींकडून कुरघोडीचं राजकारण सुरु आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर शंका उपस्थित होऊ लागली आहे. याचदरम्यान, आता 'सामना'च्या अग्रलेखातून ठाकरे गटानं शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी संजय राऊतांना डिवचलं आहे.

छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. भुजबळ म्हणाले, मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तरीदेखील संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे. त्यांना काय अडचण आहे. त्यांना राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीतून बाहेर पडावं? मनभेद निर्माण व्हावेत असं वाटतं का? असा सवाल उपस्थित करत भुजबळांनी राऊतांना खडेबोल सुनावले आहेत.

संजय राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे ग्रुप आणि त्यांच्या बॅगांवर ठेवलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे अनेकजण नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचं ठणकावून सांगतानाच राऊतांचं जेवढं आयुष्य आहे तेवढा शरद पवार यांचा राजकीय अनुभव आहे अशा शब्दांत भुजबळांनी राऊतांना डिवचलं आहे.

अग्रलेखात काय म्हटलंय?

भारतीय जनता पक्षा(BJP)ला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत. तेवढी त्यांची कुवत नाही, तर विरोधकांची बलस्थाने फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचे आहे. शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनून जगायचे, याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकाने करायला हवा.

खरे मर्द कोण?

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी लढण्याचा निर्धार केला. शरद पवार यांनी अखेरपर्यंत लढू असे सांगितले. हे झाले महाराष्ट्रातले, पण लालू यादव, के. सी. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हे नेतेही लढायला उतरले आहेत हे महत्त्वाचे. कार्यकर्ते लढतच असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो! सर्वच पक्षांतील डरपोक सरदारांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन करावा म्हणजे लोकांना कळेल, खरे मर्द कोण? असा सवाल ठाकरे गटानं अग्रलेखात केला आहे.

भाजपच्या लॉजिंग-बोर्डिंगमधले...

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, त्यांना थांबवणार नाही, असे पवारांनी सांगितले. म्हणजेच लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले आहेत. भाजपच्या लॉजिंग-बोर्डिंगमधले बुकिंग अद्याप रद्द झालेले नाही हे स्पष्ट आहे.

(Edited by Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT