Eknath Khadse News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse News : पवारांसमोर खडसेंची जोरदार फटकेबाजी ; फडणवीसांवर वार, अजितदादांना टोला

Amol Jaybhaye

NCP Jalgaon Sabha News : जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'स्वाभिमान सभेमध्ये' ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने व्हिडिओ दाखवत त्यांच्यावर हल्लाबोल केला. फडणवीस नियमित खोटे बोलतात, असा आरोप केला. फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मग त्यांना सरकारमध्ये कसे काय घेतले, असा सवला करत हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात जळगावमध्ये स्वाभिमान सभा होत आहे. या सभेत बोलताना खडसे यांनी राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला. खडसे म्हणाले, यवला आणि बीडमधील सभेपेक्षा आपल्याला जळगावमध्ये जास्त उत्साह जाणवला. शरद पवारसाहेबांचे जळगाव जिल्ह्याशी रुणानुबंध आहेत. आता पुन्हा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडणून आणायचे आहेत. आता आपण व्हिडिओ पाहिलेत, त्यामध्ये फडणवीसांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आरोप केले होते. राष्ट्रवादीशी युती करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, आता त्यांच्यासोबतच मंत्रिमंडळात बसले आहेत.

विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे म्हटले होते पण लग्न केले. राज्याला दिलेला एकही शब्द त्यांनी पाळला नाही. आता महाराष्ट्रात, मराठा समाजाला मुर्ख बनवण्याचे काम सुरू आहे. मराठा समाज ओबीसीच्या माध्यमातून आरक्षण मागत आहे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्यावे, त्यासाठी केंद्र सरकारने घटनेत दुरूस्ती करावी. सरकार त्यांच्या भावनांशी खेळत आहे, असा आरोप खडसे (Eknath Khadse) यांनी केला.

राज्यात तिघांचे सरकार आहे. अजित पवार जे बोलतात ते करतात, पण पक्ष बदलला. पक्ष बदल्यानंतर स्वाभिमानी अजितदादांनी निर्णय घ्यायला सुरूवात केली. त्यांनी निर्णय घेतला, मात्र, त्यांचे निर्णय फडणवीसांनी रद्द केले. अजित पवारांची प्रत्येक फाईल ही फडणवीसांकडे जाते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंकडे जाते. हे अजितदादा कसे काय सहन करतात काय माहिती, असा चिमटा त्यांनी काढला.

सरकारमध्ये समन्वय नाही, कायदा सुव्यवस्था राहिली नाही. जळगाव जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले आहे. अनेक अवैध धंदे सुरू आहेत. त्यावरून शासन काय करत आहे. तुम्हाला माहिती आहे, उद्याचे नेते पंतप्रधान शरद पवार आहेत, त्यांनी अशी कांडी फिरवली की रात्रीत शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. त्यांच्याकडे अनुभव आहे.

भाजपला रक्ताचे पाणी करून वाढवले, मात्र, माझे हाल केले. भाजपमध्ये पाहिले तर जुन्या लोकांना स्थान नाही. वापरा आणि फेकून द्या, अशी भाजपची निती आहे. अजित पवार यांच्यावर आरोप केले. मग त्यांना सरकारमध्ये का घेतले, असा सवाल खडसे यांनी केला. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी मय झाला पाहिजे, जिल्ह्याचा शरद पवार यांच्यावर विश्वास, त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष निवडणुकीत आता काम करू, असेही यावेळी खडसे म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT