Dada Bhuse, Chhagan Bhujbal & Divisional commissioner
Dada Bhuse, Chhagan Bhujbal & Divisional commissioner Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या ९२० कोटींचा हिशेब द्या!

Sampat Devgire

नाशिक : सरकारने (Mahavikas Aghadi) शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करूनही कर्जमुक्ती (Farmers Debt relief) दिली नाही, असे का म्हणता? कर्जमुक्ती योजनेचे सरकारकडून जिल्हा बँकेला ९२० कोटी मिळाले, त्याचा हिशेब सादर करा, या शब्दांत आज जिल्हा बँकेच्या (NDCC Bank) प्रशासनाला पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खडसावले.

यावेळी कृषीमंत्री दादा भुसे उपस्थित होते. यावेळी श्री. भुजबळ यांनी कर्जमुक्तीच्या पैशांच्या जिल्हा बँकेच्या विनियोगाच्या चौकशीचा अहवाल सरकारला सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना दिले.

राज्य सरकारने ९२० कोटी रुपये दिले. त्यातील ३३४ कोटी शेतकऱ्यांना गेल्यावर्षी पीककर्जासाठी दिले. २४८ कोटी राज्य बँकेला दिले. उरलेले ३३८ कोटी ठेवीदारांना परत करण्यात आले. तसे सरकारचे आदेश होते, असे जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगताच, पालकमंत्री छगन भुजबळ भडकले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी पीककर्ज मिळाले पाहिजे, असे श्री. भुजबळ यांनी ठणकावून सांगत कर्जवसुलीच्या नावाखाली गैरप्रकार होऊ लागल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर ओढून आणले जातात. ठराविक लोकांना ट्रॅक्टर दिले जातात. याशिवाय नोटबंदीच्या काळात कुणी पैसे जिल्हा बँकेत जमा केले आणि रिझर्व्ह बँकेने ते नाकारल्यावर त्या पैशांची पूर्तता कशी झाली, याची चौकशी विभागीय आयुक्त करतील. त्याचवेळी वीज वितरण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना कृषी पंपांसाठी कनेक्शन तत्काळ देण्यास सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या यंदाच्या खरीप तयारी आढावा बैठकीत श्री. भुजबळ आणि श्री. भुसे बोलत होते. जिल्हा बँकेकडून धनदांडग्यांना दिलेल्या कर्जाची वसुली होत नाही आणि बँकेचे अधिकारी नातेवाइकांना ट्रॅक्टर घेता येतील, अशी वसुलीची पद्धत अवलंबत असल्याचे कोरडे श्री. भुसे यांनी ओढले. त्याचक्षणी कळवण-सुरगाणाचे आमदार नितीन पवार यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्यांच्या खात्यावर आगामी काळात जमा होणाऱ्या ५० हजार रुपयांच्या विनियोग जिल्हा बँक पूर्वीप्रमाणे करणार काय? असा प्रश्‍न उपस्थित केल्यावर बैठकीतील वातावरण आणखी तापले.

राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे कर्जपरतफेडीची योजना राबवता येईल, असा मुद्दा श्री. पवार यांनी उपस्थित केला. त्यावर जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी बँकेचा तोटा ७०० कोटींचा असल्याने राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे योजना राबवता येणार नसल्याचे सांगत व्याजात ५० टक्के सवलत देण्यात येत असल्याची माहिती दिली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT