Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एकनाथ खडसे म्हणाले, `धर्म भांडण करायला शिकवत नाही`

Sampat Devgire

भुसावळ : अलिकडे जाणून बुजून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भांडण (conflict) करायला कोणताही धर्म (Religion) शिकवत नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकोप्याने (Keep Unity) राहून शांतता कायम ठेवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले.

मायनॉरिटी वेल्फेअर सोसायटीतर्फे आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते. खडसे यांचे खास सहकारी रऊफ खान हे उसामा उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात दरवर्षी रमजानमध्ये मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टीचे आयोजन करायचे. त्या पार्टीला खडसे आवर्जून उपस्थित राहात होते. सहा वर्षांपूर्वी रऊफ खान यांचे अचानक निधन झाल्याने ही परंपरा खंडित झाली होती. त्यांचा मुलगा उसामा खान यांनी ही परंपरा पुन्हा सुरू केल्याबद्दल त्यांचे खडसे यांनी कौतुक केले.

खडसे म्हणाले, की या प्रांगणातील इफ्तार पार्टी म्हटले की रऊफ खान यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी चांगली परंपरा सुरू केली होती. मुळात आपल्या शहरातील लोक एकोप्याने राहतात, पण काही लोक माथी भडकविण्याचे काम करतात. आपण संयम सोडू नये. रोजा संयम पाळायला शिकवतो. कायदे व नियम सगळ्यांनी पाळणे आवश्यक आहे, असे खडसे म्हणाले.

यावेळी माजी नगराध्यक्ष रमण भोळे, एजाज मलिक यांचीही भाषणे झाली. या वेळी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, डॉ. सुनील नेवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र पाटील, मुन्ना तेली, शफी पहिलवान, चिराग सेठ, उसामा खान आदी व्यासपीठावर उपस्थित होते. हरून उस्मानी यांनी सूत्रसंचालन केले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT