Chhagan Bhujbal, Javed Akhtar
Chhagan Bhujbal, Javed Akhtar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`इतनी अंधेरी न थी रात, पहले लिख’

Sampat Devgire

नाशिक : सभोवताली वावरताना, समाजातील सामान्यांची चर्चा कानावर पडणारी चर्चा आणि सामान्यांच्या मनातील धास्तीचे अतिशय चपखल वर्णन व धाडस असलेली शायरीतून कवी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी आपल्या बहुचर्चीत शायरीद्वारे मांडली. ते म्हणाले, ‘जो बात कहते डरते है सब, तू वो बात लिख, इतनी अंधेरी न थी रात, पहले लिख’

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शानदार उद्‌घाटन गोदाकाठी कादंबरीकार विश्‍वास पाटील यांच्या हस्ते अन्‌ चित्रपट गीतकार जावेद अख्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यात श्री. जावेद यांनी आपला ‘तू वो बात लिख’ हा शेर पेश करत साहित्यिकांना निर्भीडपणे लिहिण्याची साद घातली. त्याला रसिकांनीही भरभरून दाद दिली.

ते म्हणाले, मराठी साहित्याच्या दरबारात आल्याचा आनंद व्यक्त केला आणि नाशिककरांना त्यांनी सलाम केला. ते म्हणाले, की भाषा संपर्काचे साधन आहे, तसे भिंत उभी करणारी आहे. मी वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत आलो. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकामुळे विजय तेंडुलकर, पुलंचा परिचय झाला. अच्युत वझे, आनंद जोशी यांच्यामुळे मराठी साहित्य समजले. संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम महाराज यांनी ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोचविले. राजे, महाराजे, जहागीरदार यांच्यापेक्षा साहित्यिक श्रेष्ठ आहेत.

श्री. अख्तर म्हणाले, मुळातच, लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही. आपले परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात आहे. त्याचप्रमाणे साहित्य आणि राजकारण याचे नाते काय, हा प्रश्‍न नेहमीच उभा राहतो. मात्र, साहित्य आणि राजकारण याचे घनिष्ठ नाते आहे.

ते पुढे म्हणाले, लोकशाही व्यवस्थेसाठी कुठल्याही बंधनात न वावरणारे अतिशय महत्त्वाचे असून, साहित्यिकांनी राजकारणाच्या दबावाला बळी पडू नये. त्यांनी मुक्तपणे साहित्य लिहावे. कुठल्याही कवी-लेखकावर अन्याय होत असेल, तर सर्व लेखकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. प्रेम, फुलांविषयी लिहिण्याऐवजी प्रगतिशील साहित्य लिहिण्याची प्रेरणा १९३६ मध्ये साहित्यिकांनी घेतली होती. त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये २०० वर्षांपूर्वी पुरुषांचे नाव घेऊन लिहिणाऱ्या लेखिका होत्या, तर ८०० वर्षांपूर्वी मराठीत मुक्ताबाई यांनी सशक्त लेखन केले. ही गौरवाची बाब आहे.

यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले, उत्तम कांबळे, श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, सरचिटणीस डॉ. दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, कुंडलिक अतकरे, राजमाता शुभांगीराजे गायकवाड, प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, मुख्य समन्वयक विश्‍वास ठाकूर, उद्योजक दीपक चांदे, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, प्राचार्य प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT