bhanudas murkute, radakrishn vikhe, lahu kande sarakrnama
उत्तर महाराष्ट्र

Political News : गड मजबुतीला प्राधान्य; श्रीरामपुरात राजकीय पटलावरील सोंगट्या कधी बदलतील, याचा नाही नेम

सरकारनामा ब्यूरो

महेश माळवे

Nagar News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जुन्या-नव्याचा मेळ घालत भाजपची ताकद मजबूत केली आहे. आमदार लहू कानडे यांनी पाच वर्षांच्या कालखंडात उभ्या केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपला दावा मजबूत केला आहे. आप्तस्वकीयांसह विरोधकांचे चक्रव्यूह भेदत आपले राजकीय अस्तित्व सांभाळताना करण ससाणे यांची कसरत सुरू आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे बीआरएसनंतर कुठेही जाणार नसल्याचे सांगत असले तरी सत्तेत सहभागी होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. जनतेत सक्रिय राहत अनुराधा आदिक ह्यांच्याकडून पालिकेची मोर्चेबांधणी सुरू आहे.

एकंदरीत सत्तेचा सोपान चढण्यासाठी सर्वच नेतेमंडळींनी आगामी निवडणुकीत आपला गड मजबूत करताना सारीपाटावरील सोंगट्या बदलल्या जातील, असे संकेत देत यासाठी पडद्याआड हालचाली वाढविल्या आहेत. काँग्रेसमध्ये ससाणे व कानडे दोन गट पडले आहेत. त्यानंतर कानडे यांनी ग्रामपंचायती निवडणुकीतून आपला गट मजबूत करण्याला प्राधान्य दिले.

मध्यंतरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ससाणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ससाणे व कानडे दोघेही उपस्थित होते. त्यांच्यात समेट घडविण्यासाठी ही भेट असल्याच्या वावड्या उठल्या, मात्र त्याचे कोणी समर्थन केले नाही. दरम्यान, हेमंत ओगले यांनी ससाणे यांच्या साथीने विधानसभेसाठी तयारी सुरू केली. त्यांनी घेतलेल्या नोकरी मेळाव्याला विश्वजित कदम यांनी हजेरी लावत ससाणेंना पाठबळ दिले.

या पार्श्वभूमीवर कानडे गुजरांबरोबरच ससाणेंना सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात गेलेले संजय छल्लारे, तसेच अंजुम शेख व त्यांच्या सहकाऱ्यांशी सलगी ठेवून आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये दुफळी झाल्यानंतर अविनाश आदिक व अनुराधा आदिक हे भावंड अजित पवारांसोबत गेले आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुराधा आदिक जनतेत सक्रिय राहतात. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. आता बीआरएसची सत्ता नाही. मध्यंतरी प्राजक्त तनपुरे, संदीप वर्पे यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, मुरकुटे यांनी कुठेही जाणार नसल्याचा खुलासा करत सर्व शक्यता परतवून लावल्या, असे असले तरी राजकीय घडामोडी बघता सत्तेत सहभागी होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्याचबरोबर लोकविकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यालाही त्यांचे प्राधान्य दिसते.

अशोक कारखाना निवडणुकीपासून एकत्र आलेले मुरकुटे व ससाणे आगामी निवडणुकीत कानडेंसाठी डोकेदुखी ठरू शकतात. बाजार समितीच्या सत्तेने त्यांच्या संघटनेला उभारी मिळाली. दुसरीकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn vikhe) आपल्या राजकीय चातुर्याने जुन्या-नव्यांचा मेळ घालत भाजपची पकड मजबूत करताना दिसत आहेत. दीपक पटारे यांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात आपले राजकारण सुरू ठेवले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते हेही आता त्यांच्या व्यासपीठावर दिसतात. काही मूळ भाजपचे कार्यकर्ते अजूनही त्यांच्यापासून फटकून आहेत. त्यांचाही विचार विखे यांना करावा लागणार आहे.

अंतर्गत गटबाजीच्या वाळवीमुळे कुठेच आलबेल नाही

भाजपकडून नितीन दिनकर इच्छुक असून पटारे त्यांची ओळख भावी आमदार अशी करून देतात. तेही मतदारसंघात सक्रिय झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या मनातील मुद्द्याला हात घातला आहे. लकी सेठी यांच्या रूपाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुन्हा संजीवनी मिळाली आहे. खासदार लोखंडे सोडले तर शिंदे गटाकडे मोठे शिलेदार नाहीत. रिपाइंचेही अनेक गट कार्यरत असून त्यांनाही इतर पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागतात. एकंदरीतच सर्वच पक्षाला अंतर्गत गटबाजीच्या लागलेल्या वाळवीमुळे कुठेच आलबेल नसून सर्वांच्या नजरा निवडणुकांकडे लागल्या आहेत.

आधी दरी, आता मांडीला मांडी

ज्या उक्कलगावात कानडे यांनी केलेल्या टीकेचा धागा पकडत सचिन गुजर यांनी ससाणे यांना कानडेंपासून दूर केले. तेच गुजर बाजार समितीत सभापतिपद हुकल्याने ससाणेंपासून बाजूला झाले. त्यानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे (Bhanudas murkute) यांच्याशी सलगी करीत दिवाळी पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांच्या गाठभेट घेत आपली नाराजी उघड केली. मात्र, मुरकुटे गटातील पदाधिकाऱ्यांना ही जवळीक खटकली. त्यामुळे त्यांनी आता बाळासाहेब थोरात यांचा आदेश असल्याचे सांगत कानडे यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात धन्यता मानली.

(Edited By : Sachin waghmare)

R...

SCROLL FOR NEXT