Election Petition Maharashtra : अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर भाजपचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.
अहिल्यानगर शहरातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने ही याचिका दाखल केली असून, निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या घडामोडीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र, त्याआधी झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे ही निवडणूक चर्चेत राहिली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी तनपुरे यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली होती.
अर्ज माघारीच्या दिवशी राष्ट्रवादीचे (NCP) दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्जाच्या सूचकाने माघारीचा अर्ज दाखल केला होता. मात्र, संबंधित अर्ज आपण दिलेला नसून त्यावरील स्वाक्षरीही आपली नसल्याचा दावा पानसरे यांनी केला होता. या आक्षेपानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनही केले होते.
या घडामोडीदरम्यान आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पानसरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही पानसरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या नावाने खोट्या स्वाक्षरीद्वारे माघारीचा अर्ज दाखल करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरही निवडणुकीची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यात आल्याचा आक्षेपही नोंदविण्यात आला आहे.
याचिकाकर्त्याने पानसरे यांनी त्या दिवशी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर घेतलेल्या आक्षेपांचा उल्लेख करत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडी त्यावेळीही चर्चेचा विषय ठरल्या होत्या. आता या निवडीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने पुन्हा एकदा या निवडणूक प्रक्रियेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याचिकेवर न्यायालयात पुढील सुनावणीदरम्यान काय भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.