BJP expansion in Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी मंत्री आणि जयंत पाटील यांचे, भाचे प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश मुंबई इथल्या पक्ष कार्यालयात झाला.
रवींद्र चव्हाण तनपुरेंचं स्वागत करत असतानाच, याचवेळी सुजय विखे पाटील यांनी स्वतःच्या शर्टला असलेले पक्षाच्या कमळ चिन्हाचे स्टिकर काढून, प्राजक्त तनपुरे यांना छातीवर लावण्यासाठी चव्हाण यांच्या हातात दिले. सुजय विखे पाटील यांच्या या कृतीवेळी तनपुरे यांच्या पक्षप्रवेशामागील सूत्रधारावर शिक्कामोर्तब झाला.
भाजपमध्ये प्रवेशासोबतच प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची विधान परिषद उमेदवारीही जवळपास निश्चित मानली जात असून, या राजकीय घडामोडीमुळे शरद पवार राष्ट्रवादीला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. राज्यात राज्यमंत्री म्हणून काम केलेले तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
प्राजक्त तनपुरे यांचा पक्ष प्रवेश पार पडल्यानंतर, तनपुरेंनी सुजय विखे पाटलांचा (Sujay Vikhe) तिथंच सत्कार केला. यानंतर दोघांनी गळाभेट घेतली. विखे पाटील-तनपुरे यांच्या गळाभेट कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चव्हाण झाकून गेले. या मुंबईतील गळाभेटीतून पुढे जिल्ह्यात विखे पाटील-तनपुरे यांचे सहमतीचे राजकारण सुरू होणार असल्याचे सूचक संकेत या दोघांनी दिले.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करून विधानसभेत पाठविण्यापर्यंतच्या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये माजी खासदार सुजय विखे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली.
पक्षांतर्गत समन्वय साधत त्यांनी भाजप नेतृत्वाशी सातत्याने संपर्क ठेवला आणि उमेदवारी निश्चित झाल्यानंतर स्वतः मैदानात उतरून राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघात प्रचाराची प्रभावी धुरा सांभाळली. तब्बल 11 पेक्षा जास्त सभा घेत त्यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधत अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी निर्णायक वातावरण निर्माण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने भाजप प्रदेशाध्यक्ष रवीद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पोटनिवडणूक जाहीर होण्याआधी तब्बल सहा महिन्यांपासून सुजय विखे पाटील प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्कात होते.
याच राजकीय रणनीतीचा पुढचा टप्पा म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश झाला. जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा अचूक अंदाज घेत सुजय विखे पाटील यांनी तनपुरे यांच्याशी संवादाची दारे खुली ठेवली आणि त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली.
एकीकडे अक्षय कर्डीले यांना आमदार करण्यात यश मिळवताना दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादीमधील प्रभावी चेहरा असलेल्या प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये आणण्याची रणनीती त्यांनी यशस्वीपणे राबवली. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यामागे आणि नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यामागे सुजय विखे पाटील हेच खरे सूत्रधार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.