Prakash Ambedkar On BJP : sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prakash Ambedkar On BJP : राज्यात भाजपला लोकसभेच्या 30 जागांवरच रोखा; आंबेडकरांचं आवाहन...

Chetan Zadpe

Jalgaon News : 'येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याचा निश्चय करा. राज्यात लोकसभेच्या ४५ पैकी ३० जागा भारतीय जनता पक्षाला मिळू न देण्याचा संकल्प करा,' असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत केले. (Latest Marathi News)

जळगाव येथील महाबळ रत्यावरील, महाबळ कॉलनी येथील संत गाडगे महाराज चौकाजवळ 'सत्ता संपादन जाहीर सभेचे' आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, युवक आघाडीच्या शमिभा पाटील, चेतन गांगुर्डे, प्रमोद इंगळे, वंदना सोनवणे, माई पाटील, प्रा.सी.पी.लाभणे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'भाजप सरकारला पराभूत करण्याचा केवळ संकल्प करून भागणार नाही तर प्रत्येक मतदारपर्यंत पोहचून आपली भूमिका समजावून सांगण्याची गरज आहे. सरकारविरोधी मतदान करणारे कोण आहेत याचा विचार करून त्याच्यापर्यंत पोहचले पाहिजे. आज कंत्राटी कामगार असुरक्षित आहेत, त्यांना आपल्या रोजगाराची खात्री नाही. त्यामुळे आपले सरकार आल्यास आपण कंत्राटी कामगारांना कायम करणार आहोत, याची त्यांना हमी द्या.'

त्यानंतर आंबेडकरांनी शेतकऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली. 'शेतकरी असुरक्षित आहेत. हे सरकार त्यांची लूट करीत आहे. शेतमालाची कृत्रिम टंचाई निर्माण करून त्याचे भाव वाढवून जनतेची लूट करतात, त्यानंतर परदेशातून माल मागवल्याचे सांगून, येथील शेतमाल बाहेर काढतात आणि भाव पाडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. हे लुटारू सरकार मातीत मिळवा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले पाहिजे. त्यांना या सरकारची लुटण्याची पद्धत समजावून सांगितली पाहिजे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, 'राज्यात विरोधी आघाडीची युती होईल की नाही, हे रिंगमास्टर नरेंद्र मोदी ठरवतात. कारण जो कोणी विरोधात जाईल त्याच्यावर ईडी कारवाईचा बडगा ते उगारतात. त्यामुळे त्या भीतीने माणूस नमते घेतो. मग ते त्याला विरोधी गटात जाऊ नको, असे संदेश देतात. मोदींशिवाय पर्याय नाही, असे त्यांचे भक्त म्हणतात.

'याच भक्तांना मोदींनी काय महत्त्वाचे काम केले ते विचारा, ते सांगू शकणार नाहीत. आज पाकिस्तान पूर्ण कंगाल झाला आहे, तो जगासमोर नतमस्तक झाला आहे, परंतु अद्यापही भारतात आपले जवान मारले जात आहेत. तुम्ही छप्पन इंच छाती सांगतात ना, मग एकदाच घुसा आणि संपवून टाका, पण तुमच्यात दम नाही,' अशी टीकाही आंबेडकरांनी मोदींवर केली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT