Radhakrishn Vikhe, Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe News : 'पंतप्रधान मोदींच्या सहकार्यामुळेचं शरद पवारांचे...' ; राधाकृष्ण विखेंचं मोठं विधान!

Pradeep Pendhare

Loksabha Election 2024 : भाजपचे स्टार प्रचारक तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी शरद पवारांविषयी जुना आणि गंभीर विषय आठवणीत आणून ताजा केला. 'दाऊदच्या हस्तकांना तुम्ही विमानातून घेवून आलात हे देशाची जनता अजून विसरलेली नाही', असे म्हणत विखेंनी जुन्या जखमेवरील खपली काढली. त्यामुळे मंगळवारची पंतप्रधान मोदी यांची सभा वादळी होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांची मंगळवारी नगर शहरात सभा होत आहे. या सभेच्या तयारीचा आढावा मंत्री विखे यांनी घेतला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री विखे म्हणाले, "शरद पवार(Sharad Pawar) महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री होते. केंद्रातही त्‍यांना मंत्रीपद मिळाले. बारामतीच्‍या बाहेर जावून त्‍यांनी काय केले? नगर जिल्ह्यात आलेले उद्योग ही पवारांची मेहेरबानी नाही. आम्‍ही काय केले, यापेक्षा दाऊदच्‍या हस्‍तकांना तुम्‍ही विमानातून घेवून आलात हे देशाची जनता अजून विसरलेली नाही. शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांच्‍यावर बोलावे हेच मुळात दुर्दैव आहे. "

तसेच "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यामुळेच शरद पवारांचे राजकीय अस्तित्व टिकून आहे. विखेंनी काय केले हे शरद पवारांना सांगण्‍याची गरज नाही. या जिल्‍ह्यातून आठ वेळा लोकनेते बाळासाहेब विखे यांना संसदेत प्रतिनिधित्‍व करण्‍याची संधी मिळाली. मलाही सात वेळा जनतेने निवडून दिले. ही आमच्‍या कामाची पावती आहे. शरद पवार यांचे नगर जिल्‍ह्यासाठी काय योगदान आहे, हे त्‍यांनी एकदा सांगावे, असेही मंत्री विखे यांनी म्हटले.

शदर पवार यांचे कर्तृत्‍व काय हे राज्‍यातील आणि देशातील जनतेने पाहिले आहे. बारामतीच्‍या बाहेर ते काहीही करु शकलेले नाहीत. केवळ संस्‍था बळकावण्‍याचे काम त्‍यांनी केले. रयत शिक्षण संस्‍था ताब्‍यात घेवून त्‍याचा राजकीय अड्डा कसा केला, ‍याची टीका मंत्री विखे(Radhakrishna Vikhe) यांनी केली.

बाळासाहेब थोरात वैफल्यग्रस्त -

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्‍यावरही मंत्री विखे यांनी निशाणा साधला. 'थोरात वैफल्‍यग्रस्‍त झाले असून, त्‍यांच्‍या बोलण्‍याला आता कुठलाही आधार राहिलेला नाही. डॉ. सुजय विखे यांनी पाच वर्षात केलेल्‍या कामांची चित्रफीत मी थोरात यांना पाठविणार असून, थोरातही अनेक वर्षे राज्‍याच्‍या मंत्रिमंडळात होते. नगरसाठी त्‍यांचे योगदान काय? मंत्री पदाच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही जिल्‍ह्याला कसा फायदा करुन दिला, हे एकदा तरी सांगा. नाहीतर मी तरी महसूल मंत्रीपदाच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्यासाठी कोणते निर्णय केले हे सांगायला तयार आहे', असे मंत्री विखे यांनी थोरात यांना आव्हान दिले.

पूर्वीप्रमाणे बदल्‍यांचे रेटकार्ड आमच्‍याकडे नाही. भारतीय जनता पक्षामध्‍ये येण्‍याची तुमची तयारी झाली होती. तुमच्‍यासाठी कोणता आमदार मध्यस्थी करत होता, हे मला माहित आहे. तुमच्‍या भ्रष्ट कारभारामुळे दिल्‍लीतून कसा नकार मिळाला. याचे शल्‍य आता थोरात यांना असल्‍याचा टोला मंत्री विखे यांनी लगावला.

आंबेडकर, कोल्हेंचा विषय एका वाक्यात संपवला -

प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटावर अशी उथळ विधाने त्‍यांनी टाळली पाहिजेत, एवढेच भाष्य मंत्री विखे यांनी केले. अमोल कोल्‍हे यांनी प्रचार सभेतून केलेल्‍या टीकेचा मंत्री विखे यांनी एका वाक्यात विषय संपवून टाकला. कोल्‍हेंना अजून खूप माहिती करुन घ्‍यायचे आहे. यासाठी त्‍यांना नाटकातून बाहेर यावे लागेल असे मंत्री विखे यांनी म्हटले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT