devendra fadnavis raju shetty sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raju Shetty : राजू शेट्टींना फडणवीस मदत करतील का?

Sampat Devgire

Nashik NDCC Bank : नाशिक जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. या बँकेवर सध्या प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. बँकेतील आर्थिक व्यवहार नियंत्रणाखाली आहेत. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्हा बँक वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

शेतकऱ्यांची बँक असल्याने राज्य शासनाने ही बँक वाचविण्यासाठी आर्थिक मदत करावी. यातील दोषी संचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी राजू शेट्टी ( Raju Shetty ) यांनी फडणवीस यांच्याकड केली आहे.

माजी खासदार शेट्टी यांनी एक वर्षांपूर्वी बँक वाचविण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा नेण्यात आला होता. या मोर्चाने जिल्हा प्रशासन आणि मंत्र्यांची चांगलीच धावपळ झाली.

यावेळी तोडगा म्हणून राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याशी माजी खासदार शेट्टी यांची चर्चा घडविण्यात आली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे आणि सहकार मंत्री सावे दोघांनीही बँकेला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एक वर्ष झाले तरी अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. दोन्ही मंत्र्यांनी आपला शब्द पाळला नाही. पालकमंत्री भुसे हे तर जिल्ह्याचे आहेत. पण, त्यांनी बँकेकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

जिल्हा बँकेची थकबाकी वसूल होत नाही. राज्य शासनाकडून बँकेला आर्थिक मदत मिळत नाही. केंद्र शासनाकडून नोटबंदीच्या काळातील नोटा बदलून दिल्या जात नाहीत. परिणामी जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सुमारे 30 हजार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनी जिल्हा बँकेकडे पीक कर्जासाठी तारण आहेत.

त्यामुळे बँक अडचणीत आल्याने हे शेतकरी भूमिहीन होण्याचा मोठा धोका आहे. सध्या देखील या बँकेकडून मोठ्या प्रमाणावर वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे रोजच लिलाव केले जात आहेत. एवढी आर्थिक स्थिती खालावली असतानाही पालकमंत्री भुसे, जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधी आणि या बँकेवर संचालक असल्याने बँकेच्या स्थितीला जबाबदार असलेले आमदार मूक गिळून गप्प आहेत.

या संदर्भात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जिल्हा बँक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी देखील आंदोलनाची तयारी केली आहे. सध्याच्या प्रशासकांकडून होणारे कामकाज बँक वाचविण्यास पुरेसे नाही. त्यामुळे याबाबत राज्य शासनाने आर्थिक मदत करणे हाच पर्याय आहे.

जिल्हा बँक वाचवण्यासाठी महायुतीच्या दोन मंत्र्यांनी शब्द दिला. मात्र, तो पाळला नाही आता उपमुख्यमंत्री फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे तरी मदतीला धावून येतील का? असा प्रश्न आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याचे प्रमुख संदीप जगताप यांनी दिला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT