Hemant Godse in Supporters meeting at Nashik.
Hemant Godse in Supporters meeting at Nashik. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मी निवडणूक लढवावी की नाही हे जनताच ठरवेल!

Sampat Devgire

नाशिक रोड : सत्तेसाठी नाही तर नाशिकच्या (Nashik) विकासासाठी शिंदे गटात दाखल झालो. भाजप- शिवसेना (BJp-Shivsena) नैसर्गिक युती टाळून राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेस (NCP)- सेनेचे आघाडी सरकार आले. या निर्णयासाठी सेनेचे आमदार, खासदार मनाने यासाठी तयार नव्हते. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thakrey) सांगण्यावरून आम्ही आघाडीत जुळवून घेतले. मात्र, निधीचे वाटप व इतर बाबतींत आमच्यावर अन्याय होत राहिल्याने वेगळी भूमिका घ्यावी लागली. आमचा संघर्ष नाशिकच्या विकासासाठी आहे. यापुढेही जोमाने नाशिकचा विकास सुरूच ठेवेल, असे खासदार हेमंत गोडसे म्हणाले. (Hemant Godse claims, Alliance with BJP is natural politics)

खासदार गोडसे मुंबईहून नाशिकला पोचल्यावर शक्तीप्रदर्शन केले. उपनगराच्या इच्छामणी कार्यालयात शुक्रवारी (ता. २२) दुपारी समर्थकांचा मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट केली. माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, इगतपुरीचे देविदास जाधव, त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त भूषण अडसरे, नासाकाचे माजी अध्यक्ष तानाजी गायधनी, शिवसेना महिला आघाडीच्या लक्ष्मी ताठे, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख योगेश म्हस्के, कामगार नेते जगदीश गोडसे, विलास सांडखोरे, बाळा गव्हाणे, दत्ता सुजगुरे आदी उपस्थित होते. या मेळाव्याला चारशे ते पाचशे लोक उपस्थित होते. शिवाय पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता. खा. गोडसे म्हणाले, की शिवसेनेतून अनेक आमदार बाहेर पडल्यानंतर आम्ही सोळा खासदार उद्धव ठाकरेंना भेटलो आणि त्यांना भाजपबरोबरच्या नैसर्गिक युतीसाठी पॅच अप करण्याचे आवाहन केले.

ज्यामुळे शिवसेनेत बंडखोरीची वेळ आली त्या संजय राऊतांवर जनताही तीव्र नाराज आहे. त्यांना बाजूला करण्याची मागणी आम्ही केली. संजय राऊत बारा वर्षे खासदार आहेत. मात्र, पूर, महागाई व अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर कधी बोलले नाहीत. मतदारसंघात नागरिकांना सामोरे जायचे असेल तर विकास कामाशिवाय गत्यंतर नाही. मी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. तेव्हा जनताच ठरवेल, मी पुन्हा लोकसभा लढवायची की नाही.

भाऊलाल तांबडे म्हणाले, की अनाथांचा नाथ एकनाथ मदतीला धावला. बाळासाहेंबाचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी पुढे पाऊल टाकले. अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंनी सुसंवाद प्रस्थापित करावा. या वेळी मोठ्या प्रमाणावर खासदार गोडसे यांना बंदोबस्त व सुरक्षा देण्यात आलेली होती. खा. गोडसे यांचे नातेवाईक, निकटवर्तीय व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

भुजबळांचा विकासात खोडा

माझ्या विकासकामांत माजी पालकमंत्र्यांनी खोडा घातल्याचा आरोपही या वेळी खा. गोडसे यांनी केला. माझ्या प्रयत्नामुळे देशातील पहिली किसान ट्रेन नाशिकहून सुरू झाली. गांधीनगर व नाशिक रोड प्रेसच्या आधुनिकीकरण मान्यतेसाठी यशस्वी प्रयत्न केले. गांधीनगरला वेलनेस सेंटर सुरू केले. मुंबई-राजधानी एक्स्प्रेस दररोज दिल्लीला धावू लागल्याने नाशिककरांची सोय झाली. नदीजोड प्रकल्पामुळे सिन्नरमधील दुष्काळावर मात करता येईल. नेट- सेट परीक्षार्थींचे केंद्राचे प्रश्न सोडवले, असेही खासदार हेमंत गोडसे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT