Maharashtra politics : भारताने पाकिस्तानविरोधात सुरु केलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारी पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे.
भाजपच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याबद्दल पीएम मोदींचे कौतुक करणारी पोस्ट करण्यात आली आहे. एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात युपीए सरकारच्या काळात झालेल्या दहशतवादी कारवाया व त्यावर सरकारने घेतलेल्या भूमीकेवर टीका करण्यात आली आहे. तसेच पीएम मोदींचे कौतुक करण्यात आले आहे.
भाजपने केलेल्या या पोस्टवरुन रोहिणी खडसे चांगल्याच संतापल्या. भाजपने हा चिल्लरपणा बंद करावा अशी टीका करतानाच त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील सवाल केला आहे. मा. नरेंद्र मोदी जी भारतीय जनता पक्ष हे जे काही करत आहे ते आपल्याला पटते आहे का? देश संकटात असताना सर्व जण पक्ष, राजकारण बाजूला ठेवून एकसंध उभे आहेत. हे भाजपला बघवत नाही का? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
रोहिणी खडसेंनी पुढे म्हटलं आहे की, भारतीय सैन्याचे जवान आपल्या प्राणांची बाजी लावून पाकिस्तान विरोधात लढत आहेत. अशा परिस्थितीत भाजप असे राजकारण करत असेल तर याने देशाच्या एकजुटीवर फरक तर पडेलच शिवाय सैन्याच्या मनोबलावरही परिणाम होईल. त्यामुळे आपल्या ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.
रोहिणी खडसे यांनी भाजपने केलेल्या एक्स पोस्टला हे प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाला त्यांनी आपली पोस्ट मेन्शन केली आहे. भारत -पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. त्यावरुन त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच सवाल करत हे योग्य आहे का म्हणून जाब विचारला आहे.