Eknath Shinde, Devendra Fadanvis & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Politics: संजय राऊत यांचे फडणवीसांकडे बोट, सांगितले एन्काऊंटरचे `हे` कारण!

Sampat Devgire

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis: बदलापूर घटनेतील प्रमुख संशयित अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर आता राजकीय विषय बनू पाहत आहे. या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करण्यात येत आहे. एन्काऊंटरचे कारण काय यावर आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. हे एन्काऊंटर कशामुळे झाले? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सरकार देत असलेले कारण अत्यंत तकलादू आहे, असा दावा त्यांनी केला.

या प्रकरणावरून आणखी काही दिवस राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. खासदार राऊत यावर म्हणाले, अंडरवर्ल्ड आणि पोलीस यांच्या विषयी मला भरपूर माहिती आहे. जेवढी माहिती मला आहे तेवढी एन्काऊंटर करणाऱ्यांना आणि गृहमंत्र्यांनाही नाही. या प्रकरणात काही लोकांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे, हे आता लोक उघड बोलू लागले आहेत.

शाळेचे संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्या विरोधात `पोक्सो`अंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आला? संशयित अक्षय शिंदे यांनी आपल्या जबाबात काही महत्त्वाचे खुलासे केले होते. एन्काऊंटर का झाले? याचे कारण त्यामध्ये आहे. अशी अनेकांना शंका वाटते.

सरकार या प्रकरणात कोणाला वाचविण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना? हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे. बदलापूरची घटना अत्यंत गंभीर आहे. यामध्ये काही लोकांना वाचविण्याचा प्रयत्न झाला, हे लपून राहिलेले नाही. सरकारची सहानुभूती या प्रकरणातील लोकांशी आहे, असा सगळ्यांचा संशय आहे.

या प्रकरणातील प्रमुख संशयित शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केलेा. त्यामुळे आता जनताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय एन्काऊंटर करील, असे विधान खासदार राऊत यांनी केले.

बदलापूर घटनेचा एकूणच तपास आणि पोलिसांची कार्यपद्धती याबाबत अनेक प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले. त्यांनी याबाबत सरकारला धारेवर धरले आहे. सरकारनेही या प्रकरणात आपली भूमिका मांडतांना चौकशीचे आदेश दिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले हे एन्काऊंटर अपरिहार्यपणे राजकीय नेत्यांच्या चर्चेचे कारण ठरले आहे. निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा दुर्लक्षित राहणार नाही, असे सध्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी पक्ष दोघांनाही आरोप आणि प्रत्यारोपात रस घेताना दिसत आहेत.

एकंदरच अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण आता कोणते वळण घेते याचीही उत्सुकता सगळ्यांना आहे. बदलापूरची घटना घडली, तेव्हा नागरिकांनी उत्स्फूर्त रेल्वे रोको केला. पोलिसांच्या गुन्हा दाखल करण्याच्या विलंबासह अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले होते.

आजच्या स्थितीत हे प्रकरण राज्य सरकारला हाताळणे जड जाऊ शकतो. कारण त्याला राजकारणाची जोड मिळाली आहे. त्यामुळे शिंदे एन्काऊंटर प्ररकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधकांनी बाह्या सरसावल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT