Girish Mahajan & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : मंत्र्यांनी नाक घासलय, आता फार विषय ताणू नका ; गिरीश महाजन प्रकरणात संजय राऊतांची उडी, 'त्या' महिलेचं केलं कौतुक

Sanjay Raut On Girish Mahajan controversy : भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी एका महिला वन कर्मचाऱ्याने केली आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन वादात सापडले आहे. वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेत ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणात गिरीश महाजन यांना इशारा दिला आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अट्रोसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा असून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

दरम्यान या प्रकरणावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे मंत्री महाजन यांना उद्देशून म्हणाले की, ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. मंत्र्यांनी माफी मागितली आहे. नाक घासलेलं आहे असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, गिरीश महाजन यांना नडणाऱ्या महिला वन कर्मचारी माधवी जाधव यांचे त्यांनी कौतुकही केले. राऊत म्हणाले, 26 जानेवारी च्या दिवशी भारत प्रजासत्ताक झाला त्या दिवशी भारताला संविधान मिळाले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला हवी हे सत्य आहे. त्यामुळे त्या महिलेचा देखील सन्मान व्हायला हवा. त्यांनी ज्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये असतानाही निषेध व्यक्त केला, मी त्यांचे देखील कौतुक करतो असं राऊत म्हणाले. परंतु आता मंत्र्यांनी माफी मागितली आहे. नाक घासलेलं आहे. आता फार विषय ताणू नका असा खोचक टोलाही राऊत यांनी मारला.

नेमकं काय घडलं?

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांने २६ जानेवारी रोजी नाशिक येथे शासकीय ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने महिला वन कर्मचारी माधवी जाधव यांनी भरसभेत घोषणाबाजी करत आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही म्हणून महाजन यांना विचारणा केली. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या बाबासाहेबांचे नाव वगळणे ही मोठी चूक असल्याचे सांगत त्यांनी महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली असून आपल्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव राहून गेल्याचा खुलासा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT