MLA Saroj Ahire & Letter Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Saroj Ahire Politics: ताई तू 'विकासकन्या' होतीस. कधी 'कमिशनकन्या' झालीस हे कळलंच नाही...

Sampat Devgire

Saroj Ahire news: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. याच धर्तीवर देवळाली मतदारसंघात आमदार अहिरे यांनीही लाडका भाऊराया हा प्रयोग केला. मतदारांना 'लाडका भाऊराया' असे आवाहन करीत घरोघर पत्रक पोहोचवले.

देवळालीच्या मतदारांसाठी कालचे रक्षाबंधन एक वेगळीच चर्चा घडवून गेले. आमदार सरोज अहिरे यांनी आपण विकास कन्या आहोत. हे सांगणारे एक पत्रक घरोघर पोहोचवले. त्यात त्यांनी मतदारांना 'लाडक्या भाऊराया' असे संबोधित केले होते.

या निवेदनात आमदार अहिरे म्हणतात, भूतो न भविष्यती असे या मतदार संघाला १३०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तुमचे सहकार्य आणि आशीर्वादाने देवळाली हे विकास पर्व ठरले. हा मतदारसंघ माझ्यासाठी एक मतदार संघ नसून कुटुंब आहे. तेव्हा काळजी घे भाऊराया, सदैव आभारी राहील. असा मजकूर त्यांच्या पत्रात होता.

या निवेदनाला त्यांच्याच एका कार्यकर्त्याने नामोल्लेख टाळून उत्तर दिले. हे पत्र मतदारसंघात समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय ठरले.

हे पत्र लिहिणारा देवळाली विधानसभा मतदारसंघातील कोण? याचा शोध घेतला जात आहे. मात्र या निमित्ताने आमदार अहिरे यांच्या विरोधकांना आयताच राजकारणाचा मुद्दा मिळाला आहे. त्यावर जोरदार राजकारण सुरू झाले. या मतदारसघात अनेक इच्छूक या पत्राचे होर्डींग लावण्याच्या तयारीत आहेत.

आमदार अहिरे यांना संबोधीत केलेल्या या पत्रावर आमदार अहिरे यांचे छायाचित्र व त्यांनी रक्षाबंधनाला लिहिलेले पत्र आहे. त्यामुळे हे पत्र आमदार अहिरे यांच्याशी संबंधीत असल्याचे दिसते. त्यात संबंधीत भाऊराया म्हणतो, पाच वर्षांपूर्वी भक्कम पाठबळ देऊन आणि घरोघर वर्गणी गोळा करून स्वतःच्या जीवाचं रान करीत तुला विधानसभेत पाठवलं. आता पाच वर्षांनी का होईना भावाची आठवण झाली. गेल्या पाच वर्षात भावाचं काय चाललंय याची आठवण नाही आली का ग ताई?.

पाच वर्षांपासून काही भाऊ तुझ्या कार्यालयात येऊन राखी बांधत होते. तू त्यांना लाखोंची कंत्राट देत होतीस. ज्या भावांनी खरंच मेहनत करून तुला आमदार केलं, स्वतःच्या पैशाने गाडीत पेट्रोल टाकून तुझे झेंडे घेऊन ते फिरले, ते भाऊ आजही बेरोजगार आहेत.

तू म्हणालीस, मतदारसंघासाठी तेराशे कोटींचा निधी आणला. पण ताई, एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचार, खरेच या निधीतून झालेली विकास कामे उत्कृष्ट दर्जाची आहेत का?. ताई तू आमच्यासाठी 'विकासकन्या' होतीस. पण कधी 'कमिशनकन्या' झालीस हे कळलंच नाही ग...

त्यात पुढे म्हटले आहे की, पण एक बरे झाले, निवडणूक जवळ आल्याने तुला कॉन्ट्रॅक्टरच्या गराड्यातून बाहेर पडत भावाची आठवण झाली. ताई गेली पाच वर्षे तू खूप मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर घडवले. आता तुला आरामाची गरज आहे. याची आम्हालाही जाणीव झाली आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर आम्ही तुला आराम करण्याची संधी उपलब्ध करून देऊ.

गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंडखोरी करीत अजित पवार यांच्या गटात अनेक आमदार दाखल झाले. या आमदारांना त्या बदल्यात अर्थ खाते असलेल्या अजित पवार यांच्याकडून भरमसाठ निधी देण्यात आला. त्यावरून महायुतीच्या सहकारी पक्षांमध्ये देखील खदखद आहे.

केवळ विकास आणि निधी हे दोन गोंडस नावे घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना सोडणाऱ्या या आमदारांना आगामी निवडणुकीत कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. याची चाहूल देवळाली मतदारसंघात रक्षाबंधनाच्या निमित्ताने समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या पत्रांने होत आहे. त्यामुळे ही दोन्ही पत्र सध्या चर्चेचा विषय आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT