Rahata school event : शिक्षक आणि शिक्षणाच्या मुद्यावर नेहमीच आक्रमक राहणारे, तसंच अभ्यासक्रमात विज्ञानाचा पुरस्कार करणारे नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे हे त्यांच्या कृतीशीलतेसाठी ओळखले जातात. ओठावर जे, तेच त्यांच्या कृतीत असते. यातून त्यांचे विचार, विधानांचे पडसाद उमटतात.
असंच शिक्षकांच्या सेवानिवृत्ती वयावर सत्यजीत तांबे यांनी विचार मांडला आहे. त्यांनी शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 55 वर्षे करावे, असे म्हटलं आहे. सत्यजीत तांबे यांच्या या विधानाने शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी कान टवकारले आहेत. सत्यजीत तांबे यांच्या या विधानावरून भविष्यात वाद उफळू शकतो, अशी प्रतिक्रिया काही जाणकार देत आहेत.
आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) हे रयत शिक्षण संस्थेच्या राहाता इथल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. रयत एक्सलन्स अकॅडमीचे प्राचार्य एल. सी. रक्टे, पर्यवेक्षक सुभाष भुसाळ, पर्यवेक्षिका शोभा कडू यांच्या सेवापूर्ती समारंभात आमदार सत्यजीत तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आमदार तांबे यांनी कार्यक्रमातील भाषणात शिक्षकांच्या (Teachers) सेवानिवृत्तीच्या भाषणावर मोठं विधान केलं. ते म्हणाले, "वस्तुतः कर्मचाऱ्यांच्या शारीरिक कार्यक्षमतेचा विचार करता, निवृत्तीचे वय कमी करून 55 वर्षच करावे." शरीर व डोके पूर्ण क्षमतेने साथ देत असताना 30 ते 35 वर्षांची सेवा झाल्यानंतर योग्य वयात अन् योग्यवेळी निवृत्त झाल्यास नंतरच्या काळात सेकंड इनिंगमध्ये तशाच प्रकारचे काम करता येईल, असेही आमदार तांबे यांनी म्हटलं.
आमदार तांबे यांचे शिक्षकांच्या सेवानिवृत्तीच्या वयावर पडसाद उमटू लागले आहेत. शिक्षक आणि शिक्षक संघटनांमध्ये या विचारावर चर्चा सुरू झाल्या आहेत. शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे सध्याचे वय 58 वर्षे असताना ते वाढवून 60 वर्षे करण्याची मागणी जोर धरत आहे. यातच आमदार तांबे यांनी हे सेवानिवृत्तीच्या विधानावर भाष्य करत, नव्या वादाला तोंड फोडल्याचे दिसते.
आमदार सत्यजीत तांबे हे विधिमंडळात शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक असतात. TET सक्तीवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. ही परीक्षा म्हणजे अनुभवी शिक्षकांवर अन्याय आहे, असे म्हटलं होतं. 20-30 वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना शेवटच्या टप्प्यात परीक्षा देण्याच्या सक्तीने असंतोष निर्माण झाला आहे. तसंच शिक्षण व्यवस्थेच्या पुनर्रचनेची गरजेकडे आमदार तांबे यांनी लक्ष वेधलंलं आहे.
परंतु आमदार तांबे यांनी शिक्षकांच्या सेवानिवृत्ती वयावर भाष्य करताना, नवीन वादाला तोंड फोडलं आहे. भारतात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सामान्यतः सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे, तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे वय 58 ते 62 वर्षांच्या दरम्यान बदलते. शिक्षक आणि विशिष्ट तज्ज्ञांसाठी निवृत्तीचे वय 62 ते 65 वर्षांपर्यंत असू शकते. खासगी क्षेत्रात हे सहसा 58-60 वर्षे आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. परंतु काही पदांसाठी किंवा विशेष परिस्थितींमध्ये त्यात बदल होऊ शकतो. वैज्ञानिक, डॉक्टर, शिक्षक, विद्यापीठाचे प्राध्यापक आणि न्यायाधीश यांच्यासाठी निवृत्तीचे वय 62 ते 65 वर्षे असू शकते. निवृत्तीचे वय प्रत्येक राज्यात आणि विशिष्ट विभागांमध्ये वेगवेगळे असू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.