Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Split News : राजकारणाचा चिखल झाला; परंतु चिखलात बिया उगवतात!

Sampat Devgire

Sharad Pawar News : संसदीय लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. विरोधी पक्ष संपविण्याची व त्यांचा आवाज दाबण्याची भाजपची प्रवृत्ती आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना संघर्ष करावा लागेल. राजकारणाचा चिखल झाला; परंतु अशाही परिस्थितीत चिखलात बिया टाकून चांगले उगवता येईल. (Political mud all over noe, but seeds grow best in mud only)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचे उत्साहात स्वागत झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली.

ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल यांनीच माझ्या नावाचा प्रस्ताव मांडला होता, मग दिल्लीत झालेली बैठक बेकायदेशीर कशी ठरते? असा प्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पटेल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पक्ष सोडून गेलेल्यांना मी पुन्हा परत या, असे म्हणणार नाही. कारण त्या आता चिमण्या राहिलेल्या नाहीत. त्यांच्यावर टीका करण्यातही काही अर्थ नाही. जनतेच्या दरबारातच याचा निकाल लागेल, असे सांगताना श्री. पवार यांनी देशाच्या नकाशावर भाजपच्या विरोधात वातावरण असल्याचे उदाहरण दिले.

श्री. पवार म्हणाले, की पुलोद सरकारच्या काळात बारा आमदार नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिले. त्याचबरोबर स्व. यशवंतराव चव्हाण यांना नाशिककरांनी लोकसभेत बिनविरोध निवडून दिले. विचारांशी एकसंघ राहिलेला तसेच आमच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग नाशिकमध्ये असल्याने प्रथम नाशिकमधून भूमिका मांडण्याचा मी निर्णय घेतला.

अजित पवार यांनी त्यांच्या मुंबईतील भाषणात वयाचा विषय मांडला, त्यावर बोलताना, मी ‘ना टायर्ड आहे, ना रिटायर्ड, माझ्या वयाचा मुद्दा आलाच कुठे? मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांचे वय ८४ होते. मात्र प्रकृती चांगली असल्याने त्यांच्याकडून कामे चांगली होत होती. आताही ज्यांनी पक्ष सोडला, ते ७० च्या पुढे आहेत, असे सांगून मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अनेकांच्या वयाचा मुद्दादेखील त्यांनी उपस्थित केला.

अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव पटेलांचाच

प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली येथे झालेली बैठक बेकायदेशीर असल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना पवार यांनी पटेल यांच्यावरच उलटवार केला. दिल्लीच्या कार्यकारिणी बैठकीत सर्व सदस्य उपस्थित होते. राजीनामा दिल्यानंतर व त्यापूर्वी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव त्यांनीच ठेवला होता. त्यामुळे पक्षाध्यक्ष या नात्याने बोलविली बैठक बेकायदेशीर ठरत नसल्याचे ते म्हणाले. सत्तेची सर्व सूत्रे हाती असताना सुप्रिया सुळे यांना सत्तेची पदे मी दिली नाही. मात्र प्रफुल्ल पटेल लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही त्यांना राज्यसभेवर निवडून आणले. दहा वर्षे मंत्रिपद दिले. त्यामुळे पटेलांनी उपस्थित केलेला प्रश्न चुकीचा असल्याचे श्री. पवार म्हणाले.

बदलत्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आले, तर आनंदच होईल, असेही ते म्हणाले. राजकीय पक्ष व संघटना उद्ध्वस्त करण्याची भाजपची योजना आहे.

‘त्या’ आता चिमण्या राहिल्या नाहीत...

शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतील वाताहतीनंतर ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ या लेखातून साद घातली होती. त्यावर बोलताना पवार यांनी राष्ट्रावादीतून गेलेल्यांना मी पुन्हा बोलवणार नाही. कारण आता त्या चिमण्या राहिल्या नसल्याचे सांगितले. नाशिक शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून दोन गटांत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मूळ साधनसामग्री व संपत्तीवर हक्क सांगणे योग्य नाही. सदसद्विवेक बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

पाटील, आव्हाड यांचा अभिमान

अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्याकडून जितेंद्र आव्हाड व जयंत पाटील यांच्यावर बोलताना श्री. पवार यांनी जयंत पाटील व आव्हाड यांचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले. पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या जितेंद्र आव्हाड व जयंत पाटील यांच्यामुळे पक्ष अधिक मजबूत आहे. मला दोघांचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT