sharad pawar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : "विधानसभा निवडणुकीत जनतेचा वेगळा 'मूड' दिसून येईल", शरद पवारांना विश्वास

Sampat Devgire

Nashik News : देवळाली मतदारसंघात अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पसंती दिली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच या मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे.

देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सरोज अहिरे आमदार आहेत. त्यांनी गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर अजित पवार यांचा झेंडा हाती घेतला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही तोच कित्ता गिरवला. त्यामुळे भुजबळ यांचे नेतृत्व मांडणारे अनेक पदाधिकारी ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात केले आहेत.

त्यामुळे सध्या देवळाली मतदारसंघात नेते अजित पवार गटात आणि कार्यकर्ते शरद पवार गटात असे चित्र आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याभरात दोन वेळा महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देवळाली मतदारसंघाच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात विविध पदाधिकाऱ्यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ दिला आहे. "नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराला नापसंती दर्शविली आहे," असे शरद पवारांनी सांगितले.

पवार म्हणाले, "या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे अनेक अन्वयार्थ आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत अवघे सहा खासदार विरोधी पक्षाचे होते. ही बदललेली परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारी आहे."

"येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता सध्याच्या महायुतीच्या सरकारचा पराभव करील. महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थापन होईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील मतदारांमध्ये जाऊन परिश्रम घ्यावेत," असं शरद पवारांनी सांगितलं.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रवेश केलेले कार्यकर्ते आणि या पक्षप्रवेशासाठी परिश्रम घेतलेल्या लक्ष्मण मंडाले यांचे स्वागत केले. "प्रवेश केलेल्या सर्वांना योग्य मानसन्मान मिळेल आजवर पक्षावर अनेक आघात झाले आहेत, मात्र शरद पवार यांनी कधीही विचारांची तडजोड केली नाही. त्यांची वैचारिक बांधिलकी राज्यातील जनतेला भावली आहे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवळाली मतदारसंघातील इच्छुक उमेदवार लक्ष्मण मंडाले यांचा विशेष उल्लेख केला. "तुम्हाला आणखी परिश्रम करावे लागणार आहेत. मतदारसंघात जाऊन प्रत्येक गावपातळीवर शरद पवार यांचे विचार पोहोचवावे लागतील. सध्याच्या राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने महाराष्ट्रात अनागोंदी माजवली आहे. ती जनतेला नको आहे. याबाबत वातावरण निर्मिती करावी लागेल. गत निवडणुकीत मंडले यांची संधी ऐनवेळी हुकली होती. यावेळी तसे होऊ नये यासाठी परिश्रम घ्या," असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT