Shiv Sena Rebellion : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी घेतलेल्या बंडखोर राजकीय भूमिकेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण अक्षरशः पेटलं आहे.
दोन दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी वाकचौरेंविरोधात आक्रमक आंदोलन करत, ते मतदारसंघात दिसल्यास “ठोकून काढू” असा थेट इशारा दिला होता. आता त्यानंतर श्रीरामपूरमध्येही संतप्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.
श्रीरामपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या (Shivsena UBT) कार्यकर्त्यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या फोटोवर ‘गद्दार’ असे लिहून त्याला चप्पलांचा हार घालत जोरदार निषेध केला. आंदोलनस्थळी “लालची कुत्रा”, “पैशासाठी कायपण”, “आज पण-उद्या पण, नया नही पुराण है वो!” असे आक्रमक फलक झळकवण्यात आले. तालुकाप्रमुख लखन भगत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, संगमनेर मतदारसंघातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे अमोल खताळ यांनी वाकचौरेंच्या बंडखोरीचं उघड समर्थन करत त्यांच्या स्वागताचे बॅनर झळकवले. या वेळी खताळ यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला थेट आव्हान देत “आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत, भाऊसाहेब वाकचौरेंची ढाल बनू” असा इशारा दिला. त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय संघर्ष अधिकच चिघळला आहे.
यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील स्पष्ट भूमिका घेत वाकचौरे आता महायुतीत आणि एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले. त्यांच्या विरोधात कुठलाही चुकीचा प्रयोग केल्यास “परिणाम भोगण्याची तयारी ठेवा”, असा सूचक पण गंभीर इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
शिर्डी मतदारसंघात आता चित्र स्पष्टपणे दोन गटांत विभागलं गेलं आहे. एका बाजूला शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते वाकचौरेंना मतदारसंघात फिरू न देण्याची भूमिका घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने खासदारांच्या समर्थनात पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये “शिवसेना विरुद्ध शिवसेना” असा थेट संघर्ष पुढील काही दिवसांत आणखी उग्र होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, फुटीर खासदारांच्या निर्णयानंतर अहिल्यानगरमध्ये संतापाची लाट उसळली असून शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी गवई गटाच्या कार्यकर्त्यांनी फुटीर खासदारांच्या प्रतिमांना जोडे मारत पायदळी तुडवत निषेध नोंदवला. काही ठिकाणी या खासदारांना प्रतीकात्मक श्रद्धांजलीही वाहण्यात आली.
या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी मोठी मागणी पुढे केली आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन नंतर जनादेशाशी बेईमानी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनता थेट जबाबदार धरण्यासाठी देशात 'राईट टू रिकॉल', कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली. 'मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांना पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच परत बोलावण्याचा अधिकार जनतेला मिळायला हवा,' अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
अहिल्यानगर जिल्ह्यात आता भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बंडानंतर केवळ राजकीय समीकरणेच बदललेली नाहीत, तर शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष उघडपणे रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, या संघर्षाला आता भाजपकडूनही उघड पाठबळ मिळताना दिसत असल्याने आगामी काळात हा वाद आणखी मोठा राजकीय स्फोट घडवू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.