Sanjay Raut, Gulabrao Patil News
Sanjay Raut, Gulabrao Patil News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : ''जळगाव जिल्ह्यात गुलाबरावांच्या 'गुलाबो गँग'चा नायनाट होईल''

कैलास शिंदे :सरकारनामा ब्यूरो

Jalgaon News : शिवरायांच्या काळात अफजल खान, औरंगजेब अशी ही लूटमार करणारी होती, त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बंदोबस्त केला होता. त्याचप्रमाणे आता जळगावात 'गुलाबो गॅंग' असून लुटमार, लफंगेगिरी करणारी टोळी आहे. आताही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच खानदेशातील या 'गुलाबो गँग'चा नायनाट करेल, असा सणसणीत टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यानी जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना लगावला आहे.

पिंप्राळा येथील शिवस्मारक भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. जळगाव येथील पिंप्राळा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन खासदार संजय राऊत यांच्याहस्ते करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दौऱ्यास उन्हामुळे विलंब होत असल्याने खासदार संजय राऊत यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले.

या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले.

संजय राऊत म्हणाले की, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी शिवसेनेची तोफ आहेत, त्यामुळे जे कोणी घुसायची भाषा करत आहेत त्यांना येऊ द्या, असा ईशाराही त्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवाजी महाराज यांचे विचार सांगण्याची गरज नाही.

पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यास याच 'गुलाबो गॅंग'ने अनेक अडथळे आणले हे देखील आम्हाला माहित आहे. मात्र, ते दूर झाले आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळात अफजलखान औरंगजेब अशी रयतेला लुटमार करणारी गँग होती. तशीच गँग आता जळगाव जिल्ह्यात लुटमार व लफंगेगिरी करणारी 'गुलाबो गँग'आहे, छत्रपती शिवाजी महाराज याचे स्मारक पूर्ण झाल्यावर त्यांना त्याच्या आसपासही फिरकू देवू नका, आज छत्रपती शिवाजी महाराजाचा विचार जनतेत आहे. आणि हाच विचार खानदेशातील 'गुलाबो गँग'चा नायनाट करणार आहे.

दगडाचे नव्हे हे तर खोक्याचे भ्रष्टाचारी- अंबादास दानवे

राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आम्ही दगड मारून संघर्ष करतो असे ते म्हणतात, आता हे दगड मारणारे नव्हे तर खोके घेणारे भ्रष्टाचारी झाले आहेत. त्यांच्यातील स्वाभिमान नष्ट झाला आहे. त्यामुळे त्यांनी आता अश्या वल्गना करू नये त्यांच्यामुळे शिवसेना संपणार नाही, उलट ताकदीने उभी राहील असा टोला देखील त्यांनी लगावला.

या वेळी खासदार अरविंद सावंत जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचलन हर्षल पाटील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT