Dhule shivsena leaders in Press conference
Dhule shivsena leaders in Press conference Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

धुळे कचरा भ्रष्टाचार; भाजपचे ५२ पैकी ४७ नगरसेवक तुरुंगात जातील!

Sampat Devgire

धुळे : शहरातील कचरा ठेक्याच्या उलाढालीत ठेकेदार वॉटरग्रेस (Watergrace compony) कंपनीपेक्षा सर्वाधिक भाजपनेच (BJP) डल्ला मारला आहे. त्यांनी कचऱ्यातही पैसे खाऊन शहरात घाण केली, असा गंभीर आरोप शिवसेना (Shivsena) नेत्यांनी केले आहे.

रस्ते, खड्ड्यांप्रश्‍नी शिवसेनेची आंदोलने नव्हे तर निवडणूक समोर ठेऊन केलेली नौटंकी होती, अशी टीका महापौर प्रदीप कर्पे यांनी केली होती. त्याला शिवसेनेने पत्रकार परिषदेत कडवट शब्दांत प्रत्युत्तर दिले. पात्रता नसताना महापौर पद मिळाल्याने शहराचे कर्पे यांनी शहराचे वाटोळे केले. ते महापालिकेतील लबाडांचे सरदार आहेत, अशा खोचक शब्दांत शिवसेनेने महापौर कर्पे यांच्यावर पलटवार केला.

शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे, सतीश महाले आणि जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, डॉ. सुशील महाजन, राजेश पटवारी, किरण जोंधळे, गुलाब माळी, संजय गुजराथी, राजेंद्र पाटील, संदीप सूर्यवंशी, ललित माळी, मोहनसिंग तनवाणी, भरत मोरे, बाळू आगलावे, संजय वाल्हे, समाधान शेलार आदी उपस्थित होते.

श्री. मोरे म्हणाले, की शहरातील रस्ते विकासासाठी २३ कोटी ३९ लाखांचा निधी शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. त्यासाठी येथील पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे वाडीभोकर रोडचे काम मार्गी लागत आहे. त्याच्या श्रेयासाठी भाजपकडून औपचारिक उद्‌घाटन झाले. मनपातील सुस्त सत्ताधारी भाजपमुळे विकास कामे दीड वर्षांपासून ठप्प आहेत. शिवसेनेच्या आंदोलनांच्या दणक्यामुळे कामांना सुरवात झाली. कचरा शेठ महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा आहे, असे सांगत १७ कोटींच्या निविदेतील या ठेक्यात भय्याने २५ लाख रुपये घेतल्याचा, तसेच कचरा संकलन ठेक्यात संबंधित प्रत्येकाला पाकीट हवे होते, त्यामुळे कचरा संकलन ठेकेदार वॉटरग्रेस कंपनीपेक्षा मनपातील सत्ताधारी भाजपने जास्त कमावले, असाही गंभीर आरोप श्री. मोरे यांनी केला. ठेकेदारी माझा व्यवसाय आहे. त्यामुळे कचरा ठेक्यात मी भागीदार होतो. व्यवसाय करणे यात काहीच गैर नाही, असे स्पष्टीकरणही श्री. मोरे यांनी दिले.

तर नगरसेवक तुरूंगात

भाजपमधून भरमसाट टक्केवारी घेतल्याने शहरात निकृष्ट दर्जाची कामे झाली. मनपातील बांधकामसह चार खात्यांचे स्पेशल ऑडिट करून एसआयटी नेमण्याची मागणी आहे. नगरोत्थान योजनेत महापालिकेने अपेक्षित रस्ते न घेता मोठ्या दोन-चार ठेकेदारांना काम मिळेल, अशा पद्धतीने नियोजन केले. त्यातून शहर खड्ड्यात जात जात आहे. श्रेयासाठी नैतिकता लागते, ती भाजपकडे नसल्याने ते ठेकेदाराला बोलू शकत नाही. ठेकेदारांना बोलण्याचे काम शिवसेनेने केले.

महापालिकेला मिळालेल्या पाचशेवर कोटींतून सत्ताधाऱ्यां‍नी स्व-विकास साधला, असा आरोपही श्री. मोरे यांनी केला. श्री. महाले म्हणाले, की भूमीगत गटार योजना एमजीपीकडे वर्ग करताना भाजचीच सत्ता होती. ठेकेदार गुजरातचा म्हणजे नमो भूमीतील आहे. मनपात भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे ही योजना गुणवत्तापूर्ण राबवून घेण्याची जबाबदारी भाजपचीच आहे. श्री. मिस्त्री म्हणाले, की जळगावप्रमाणे धुळ्यातील ५२ पैकी किमान ४७ नगरसेवक तुरुंगात जातील, असा दावा आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT