Sadashiv Lokhande -Nilwande water  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sadashiv Lokhande : निळवंडेच्या पाण्यासाठी शिंदेंचे खासदार मैदानात; गावागावांत अधिकाऱ्यांच्या बैठका लावणार...

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : जायकवाडीला नगर जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या पाण्यावरून शिवसेना शिंदे गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे मैदानात उतरले असून, निळवंडे पाण्यासाठी गावागावांत अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. जायकवाडीसह जिल्ह्यातही पाण्याचा प्रश्न असून, त्यासाठी नियोजन गरजेचे आहे.

याबाबत खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी,गेल्या 53 वर्षांपासून वाट पाहत असलेल्या निळवंडे लाभधारक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन टीएमसी पाणी मागितले होते. तत्काळ त्यांनी रात्री साडेअकरा वाजता जलसंपदा विभागाच्या सचिवांना फोन करून आपल्याला पाणी वाढवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती लोखंडे यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता प्रत्येक गावात पूर्ण क्षमतेने तसेच विनावादाचे पाणी मिळण्यासाठी अधिकारी व शेतकरी यांच्या बैठका लावण्यात येणार असून, लाभक्षेत्राला पाणी दिले जाणार असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी निळवंडे डाव्या कालव्याचे शेतकरी व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी शिर्डी विश्रामगृहात खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली. यावर बोलताना लोखंडे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी अनेक वेळा वाट पाहवी लागली. परंतु, शेवटी भेट घेण्यात आली व तत्काळ कार्यवाही सुरू झाली. निळवंडेच्या पहिल्या चाचणीत काही शेतकऱ्यांना पाणी मिळाले तर काही गावे वंचित राहिली होती.

दुसरी चाचणी सुरू झाली. परंतु, प्रत्येक गावाला पाणी मिळाले नाही, त्यामुळे आता पाण्याची क्षमता वाढवण्यात आली असून, आता प्रत्येक गावाला पाणी मिळणार आहे, परंतु वादविवाद न घालता आता प्रत्येकाला पाण्याचा वाटा मिळण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहे . त्यामुळे गावातील तलाव, बंधारे, ओढे तसेच शेततलाव तुडुंब भरू दिले जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असे खासदार लोखंडे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्थ केले.(Nilwande Water)

पाणी वळवण्यासाठी पुढाकार घेणार

मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निळवंडेचा प्रश्न सुटला असून, दीड टीमसी पाणी सोडले जाणार आहे . आता निळवंडे नंतर दुसरा संघर्ष आपल्याला करायचा असून, त्यामध्ये घाटमाथ्याचे पाणी वळविण्याचे काम आहे, येथे माझी जागा सध्या आरक्षित असली तरी तुमची शेती कायमची आहे. त्यामुळे या भागाला पाणी कधी कमी पडू दिले जाणार नाही. त्यासाठी आपल्याला घाटमाथ्याचे काम करायचे आहे, असे खासदार लोखंडे यांनी सांगितलं.

या वेळी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, बाजीराव दराडे, निळवंडे समीतीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, विठ्ठल घोरपडे, राजू सोनवणे सदाशिव गोंदकर, प्रकाश चित्ते यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT