uddhav thackeray | eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाने सरकारची केली कोंडी, सत्ताधारी आमदारही वैतागले!

Sampat Devgire

Nashik News : मुंबई-आग्रा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. प्रचंड वाहतूक कोंडी आहे. त्यावर वारंवार आश्वासन देऊन्ही राज्य सरकार काहीही उपाय करू शकलेले नाही. राज्य शासन आणि सत्ताधारी मंत्री व आमदारांची या विषयावर कुचंबना होत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने ही संधी साधली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मंगळवारी घोटी नाक्यावर मोठे आंदोलन केले.

त्यामुळे चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे आंदोलन करण्याआधी शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आठवड्यापूर्वीच 'अल्टिमेटम' दिला होता. त्यानंतरही सुधारणा झाली नाही. त्यामुळे थेट घोटी टोल नाका बंद करण्यात आला.

विशेष म्हणजे या आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेना ( Shivsena ) ठाकरे गट अत्यंत संघटित आणि एकोप्याने सरकार विरोधात लढताना दिसला. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, माजी आमदार योगेश घोलप, माजी नगरसेवक प्रशांत दिवे आदी असंख्य नेते आणि पदाधिकारी आंदोलनात उतरले होते. त्यामुळे पोलिसही अक्षरशः हतबल झाले. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला घटनास्थळी येऊन समजूत घालावी लागली.

नागरिकांकडून टोल घेणे बंद करा, ही शिवसेना ठाकरे गटाची मागणी होती. सर्वसामान्य जनता आणि वाहन मालकांना भावणारी मागणी शिवसेना ठाकरे गटाने उचललेली आहे. त्यामुळे प्रचंड निधी आणण्याचा दावा करणारे सत्ताधारी आमदार आणि प्रत्यक्ष अभावानेच दिसणारी विकास कामे या स्थितीत काय उत्तर देणार, अशी स्थिती शिवसेना ठाकरे गटाने निर्माण केली आहे.

या प्रश्नावर गतवर्षीही विधानसभेत राज्य सरकारची मोठी कोंडी झाली होती. त्यावर तत्पुरती मलमपट्टी करण्यात आली. मात्र, प्रश्न सुटला नाही. यंदाही या संदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी हा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता.

विरोधकांच्या या लक्षवेधीला चक्क सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनीही सहमती दर्शवली होती. त्यावर गरमागरम चर्चा झाली. जिल्ह्यातील 15 पैकी तेरा आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यांची बोलती बंद झाली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सरकारची नेमकी दुखरी नस पकडली आहे. रोज हजारो नाशिककर मुंबईला जातात. त्यांची प्रचंड गैरसोय होते. वारंवार तक्रारी करू नये राज्य सरकार या विषयावर असहाय्य असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील दोन मंत्री आणि बारा आमदार जनतेच्या अडचणीची काय दखल घेतात, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT