sugarcane rate protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sugarcane Price : श्रीगोंद्यातील 'गौरी'ने इतर कारखान्यांचे टेन्शन वाढवले, उसाला दिली सर्वाधिक उचल!

Pradeep Pendhare

Ahmednagar News : नगर जिल्हा उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. या आगारात ऊस, दूध आणि पाणी, याभोवती सहकारातील राजकारण फिरते. उसाबरोबर दूध दरवाढीवर सध्या नगर जिल्ह्यात संघर्ष उफाळला आहे. यातच ऊसदराबाबत श्रीगोंद्यातून मोठी बातमी समोर आली आहे.

श्रीगोंद्यातील हिरडगाव येथील पूर्वीचा साईकृपा व आजचा 'गौरी' शुगर पुन्हा चर्चेत आला आहे. भाजप आमदार बबनराव पाचुपते यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेला हा कारखाना त्यांच्या काळात अडचणींमुळे चर्चेत होता. आता तो कारखाना बाबूराव बोत्रे या उद्योगपतींनी घेतला आहे. श्रीगोंद्यातून उद्योजक बोत्रे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी टाकलेला ऊसदरवाढीचा डाव इतर कारखानदारांना अडचणीचा ठरणार आहे, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरणार आहे.

उद्योजक बोत्रे यांच्या 'गौरी' शुगरने उसाला पहिला हप्ता 3 हजार 106 रुपये दिला आहे. 'गौरी'ने उसाला तीन हजार रुपयांच्या पुढे भाव दिल्याने श्रीगोंद्यातील स्थानिक नागवडे आणि कुकडी कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 'नागवडे'ने 2 हजार 500 रुपये, तर 'कुकडी'ने 2 हजार 600 रुपयांची पहिली उचल दिली आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत.

'गौरी'ने दिलेल्या तीन हजार रुपयांच्या दर श्रीगोंद्याबरोबर नगर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांना आव्हान देणारा ठरला आहे. उसाला दर देताना कारखाना व्यवस्थापनाकडून काटकसरीचे प्रकार होत आहेत. इतरांच्या बरोबरीने दर देऊ, अशी घोषणा काही कारखान्यांनी केली आहे. त्यामुळ 'गौरी'च्या दराने इतर साखर कारखान्यांची अडचण केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्योजक बाबूराव बोत्रे नगर जिल्ह्यासह सोलापूर, लातूर, कोल्हापूर, उमरगा येथील कारखाना चालवण्याचा मोठा अनुभव दिसतो. यातूनच त्यांनी श्रीगोंद्यातील 'गौरी'ने उसाला दिलेला पहिला हप्ता 3 हजार 106 रुपयांची पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे. ही पहिली उचल आज शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याची माहिती गौरी कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या कारखान्याने श्रीगोंद्यासह राहुरी, कर्जत, जामखेड, जुन्नार, आष्टी, शिरूर, आळेफाटा भागातील ऊस आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे.

'गौरी'चे यंदाचे उद्दिष्ट हे नऊ लाख टन गाळपाचे असल्याचे सांगण्यात आले. गौरीच्या या बेधडक चालीमुळे इतर कारखान्यांच्या व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत. तेदेखील कामाला लागले आहे. यातून ऊस भाववाढीला बळ मिळणार असे दिसते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT