Shrirampur murder case : श्रीरामपूरमधील युवा हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी आणि संबंधित संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई करण्याच्या मागणीसाठी दुबय्या कुटुंबाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
15 ऑगस्टपासून महात्मा गांधी पुतळ्यासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शनिवारी आंदोलनस्थळी भेट देऊन कुटुंबीयांची भेट घेतली. पोलिसांनी यापूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर नेमकी कोणती कारवाई झाली, याची माहिती पोलीस अधीक्षकांनी श्रीरामपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन द्यावी, अशी सूचना आपण करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन अधिक प्रभावी कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
श्रीरामपूरमधील (Shrirampur) युवा उद्योजक आकाश दुबय्या यांची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. मात्र, या हत्येमागील टोळीतील मुख्य सूत्रधार किंवा तथाकथित ‘आका’ अद्याप कायद्याच्या कचाट्यात आले नसल्याचा आरोप दुबय्या कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेनंतर संबंधित आरोपी आणि संघटित गुन्हेगारी टोळीवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. मात्र, हत्या होऊन महिना उलटल्यानंतरही अपेक्षित कारवाई न झाल्याने कुटुंबीयांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. “जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही आणि सरकार या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नाही, तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही,” असा निर्धार दुबय्या कुटुंबाने व्यक्त केला आहे.
दुबय्या कुटुंबाच्या आंदोलनाला श्रीरामपूरमधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर आणि निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनस्थळी करण्यात आली.
नगराध्यक्ष करण ससाणे, वैशाली चव्हाण, प्रकाश चित्ते, सचिन गुजर, अशोक थोरे, सुभाष त्रिभुवन, रमादेवी धीवर यांच्यासह अनेकांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून दुबय्या कुटुंबाला पाठिंबा दिला. हत्येच्या घटनेला महिना उलटूनही मुख्य सूत्रधारांवर कारवाई आणि ‘मोक्का’चा प्रस्ताव पुढे न गेल्याने पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आंदोलनस्थळी कैलास दुबय्या आणि शेखर दुबय्या यांच्यासह कुटुंबीयांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना श्रीरामपूरमधील गुन्हेगारी आणि या प्रकरणातील तपासाबाबत माहिती दिली. संबंधित आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असूनही संघटित गुन्हेगारीविरोधात अपेक्षित कारवाई होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावर विखे पाटील यांनी पोलिसांच्या तपासातील प्रगतीबाबत नाराजी व्यक्त केली. मागील आंदोलनादरम्यान पोलिसांनी लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याची स्पष्ट माहिती जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनस्थळी बोलताना आमदार हेमंत ओगले यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर आरोपींवर आणि श्रीरामपूरमधील संघटित गुन्हेगारीतील संबंधित टोळीवर ‘मोक्का’ लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला. मात्र, महिना उलटल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत, या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ओगले यांनी केली.
दरम्यान, आकाश दुबय्या हत्या प्रकरण अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असून, घटनेच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस गोपनीय पातळीवर तपास करीत असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. तपासाची दिशा योग्य पद्धतीने पुढे जावी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी जिल्ह्यात अधिक प्रभावी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता पोलीस अधीक्षक श्रीरामपूरमध्ये येऊन या प्रकरणातील तपास, आतापर्यंतची कारवाई आणि ‘मोक्का’बाबतची पुढील प्रक्रिया याविषयी स्पष्ट माहिती देतात का, याकडे दुबय्या कुटुंबासह श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.