Dr. Vijaykumar Gavit
Dr. Vijaykumar Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Vijaykumar Gavit राज्यातील कातकरी समाजाचे पुनर्वसन करणार

Sampat Devgire

नाशिक : उभाडे (ता. इगतपुरी) (Igatpuri) वस्ती येथील कातकरी (`Katkari`community) समाजाच्या मुलीची वेठबिगारीसाठी (Bonded labour) झालेली विक्री व त्यानंतर मुलीचा झालेला मृत्यू हा सर्व प्रकार दुर्दैवी आहे. या घटनेत मेंढपाळांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत कातकरी समाजाची १२ मुले सोडवून आणण्यात आली असून, इतर मुलांचा शोध घेतला जात आहे. (Trible department will take cognizance of `Katkari`community issues)

या घटनेनंतर आता राज्यातील कातकरी समाजाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी राज्यात सर्वेक्षण करून पुढील तीन वर्षांत त्यांना घरकुल, विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार देत त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावला जाणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

तीन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री डॉ. गावित यांनी इगतपुरी येथील घटनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासमवेत विश्रामगृहात बैठक घेतली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीसाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत, प्रकल्प अधिकारी वर्षा मिणा, कळवण प्रकल्प अधिकारी विकास मिणा, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अनिल दौंड आदी उपस्थित होते.

डॉ. गावित म्हणाले, की नाशिक आणि नगर जिल्ह्यातील मेंढपाळ ही कातकरी समाजातील मुले शेळ्या चारण्यासाठी काही पैसे देऊन विकत घेत असल्याचा प्रकार घडला आहे. यातून एका मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना शासनातर्फे केल्या जाणार आहेत. या घटनेत दोषींवर गुन्हा दाखल झाला आहे. आणखी काही मुलांची अशा प्रकारे विक्री झाली का, त्याचाही शोध घेतला जात आहे.

राज्यातील कातकरी समाजाचे सर्वेक्षण करत त्यांना एकत्र आणत पुढील तीन वर्षांत त्या सर्वांना घरकुले देत स्थलांतर थांबविले जाईल. शासनाच्या विविध योजनांतून रोजगार, व्यवसायाच्या संधी आणि त्यांच्या मुलांना शासकीय आश्रमशाळेत प्रवेश देत शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाईल.

सोडवून आणलेल्या मुलांना राज्य शासनाकडून ३० हजार रुपये मदत, तर केंद्राकडून दोन लाख रुपये मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठविला जाईल. यासह कातकरी समाजास दिलेल्या काही जमिनींवर इतरांनी अतिक्रमण केले आहे. त्या जमिनीवरील अतिक्रमण काढून जमिनी पुन्हा समाजात दिल्या जातील, असेही डॉ. गावित म्हणाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT