Nagar Lok Sabha Election 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe-Patil: सुजय विखेंच्या इंग्रजीवरून बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राची आठवण; मला इंग्रजी ना कळतं ना हिंदीही!

सरकारनामा ब्यूरो

Nagar News: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये (Nagar Lok Sabha Election 2024) सुजय विखे (Sujay Vikhe) विरुद्ध नीलेश लंके लढत होत आहे. दोघांमध्ये सध्या कलगीतुरा रंगत आहे. इंग्रजी बोलणे हा प्रमुख मुद्दा प्रचारात नगरमध्ये गाजत आहे. "नीलेश लंकेंनी (Nilesh Lanke) माझ्यासारखे इंग्रजी बोलावे. हवे तर महिनाभर पाठांतर करावे. जर ते इंग्रजीत फाडफाड बोलले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही," असे चॅलेंज भरसभेत सुजय विखेंनी लंकेंना दिले. त्याला लंकेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.

सुजय विखे यांनी आपल्या जाहीर भाषणात ते उमेदवारी अर्ज मागे घेतील, मात्र त्यासाठी त्यांनी नीलेश लंकेंच्या समोर एक अट ठेवली. नीलेश लंकेंनी माझ्यासारखे इंग्रजी बोलावे. हवे तर महिनाभर पाठांतर करावे. जर ते इंग्रजीत फाडफाड बोलले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे चॅलेंज भरसभेत सुजय विखेंनी लंकेंना दिले.

विखेंच्या इंग्रजीवरून ते सोशल मीडिया नेटकऱ्यांच्या निशाणावर आले आहेत. पण पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे इंग्रजी आणि हिंदीविषयी विचार काय होते, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. ‘देह वेचावा कारणी’ (पृष्ठ ३२८) या बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्रात संसद सदस्य होताना त्यांनी इंग्रजी आणि हिंदीविषयी महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले होते. त्यांची आठवण अनेक वाचकांना झाली आहे.

दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विठ्ठलराव विखे पाटलांना खासदारकीची निवडणूक लढण्यास सांगितले होते. त्याबाबत विखेंनी आपल्या आत्मचरित्रात सविस्तर स्पष्ट केले आहे.

१९७१ रोजीच्या मुदतपूर्व निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. कोपरगाव लोकसभा मतदाससंघातून बी. जे. खताळ आणि माजी आमदार शंकरराव काळे यांच्यासह भलेभले नेते येथून लढायला तयार नव्हते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी विठ्ठलराव विखे पाटील यांना बोलावून घेतले होते. यशवंतराव म्हणाले की, काय करायचे! विखे पाटील? कोणाला उभे करायचे? जिल्ह्याचा एकही पुढारी उभा राहायला तयार नाही. सगळ्यांनाच आमदार व्हायचंय. आता तुम्ही उभे राहा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावर विठ्ठलराव म्हणाले, ‘‘साहेब, मी बरा आहे इथंच! माझा नाना पाटील होईल. मला इंग्रजी ना कळतं ना हिंदीही! भाषण करता येणार नाही. नाना पाटील एवढा कर्तबगार. पण, दिल्लीत बिचारा प्रभाव पाडू शकला नाही. तेथे इंग्रजी येणाराच पाहिजे. पण, मला एक कळत नाही. अण्णासाहेब, मतदारसंघ का बदलतो. आम्ही आहोत ना निवडून आणायला.’’ त्यावर यशवंतराव म्हणाले होते की, ते मला नाही सांगता यायचं. पण, त्यांची अजिबात इच्छा नाही. ते नकोच म्हणतात, उत्तरेत उभं राहायला. त्यावर विठ्ठलराव म्हणाले,‘‘ठीक आहे. जाऊ द्या त्यांना दक्षिणेत! मी पाहतो कोणीतरी! उमेदवार म्हणून बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव पुढे आले.

खासदारकीबाबत काय वाटत होते, हे त्यांनी या आत्मचरित्रात लिहिले. ते म्हणतात, ‘‘ आपण तर मॅट्रिक झालेलो. पण, नकार देण्याचा मला अधिकार नव्हता. नाव पक्के झाल्यावर मीही हे विचार डोक्यातून काढून टाकले आणि आता उभे राहिलो ना! पाहू जे व्हायचे ते होईल. मग मला कि. बा. म्हस्के, आठरे पाटील, फलके गुरुजी, कानवडे पाटील यांनी पार्लमेंट कसे चालते, जात्यावर बसलं की ओव्या सुचतात! तुम्ही चांगलं काम कराल, असं मानसिक बळ दिलं आणि पुढे निवडून आलो.’’

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT